गयाना :- डावखुरा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिस-या सामन्यात एक अनोखी कामगिरी केली आहे. कुलदीप यादव याने या सामन्यामध्ये 3 विकेट घेत इतिहास रचला आहे. सर्वात जलद 50 बळी घेणारा भारताचा पहिला तर जागतिक क्रिकेटमधील चौथा गोलंदाज ठरला आहे. त्याने आपलाच सहकारी लेगस्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या कामगिरीला मागे टाकले आहे.
कुलदीपने 30 सामन्यांतच हा पल्ला गाठला आहे. चहलने 34 सामन्यांत 50 बळी घेतले होते. यापूर्वी चहल, जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार यांच्या नावावर सर्वात जलद 50 बळी घेण्याचा विक्रम होता.
चहलने 34 सामन्यात 50 तर बुमराहने 41 सामन्यात 50 बळी पूर्ण केले. त्याचबरोबर अश्विनने 42 आणि भुवनेश्वर कुमारने 50 सामन्यांमध्ये हा टप्पा पार केला होता.
चहल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार तर, सर्वात कमी चेंडूत 50 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव चौथ्या क्रमांकावर दाखल झाला आहे.