जयपूर – येथील बिर्ला सभागृहात राज्यस्तरीय इंदिरा गांधी स्मार्ट फोन योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गेहलोत यांनी महिला व मुलींना स्मार्ट फोनचे वाटप केले. तसेच त्यांनी लाभार्थी महिलांशी संवाद साधला. यावेळी बोलताना गेहलोत म्हणाले की, आजपासून आम्ही 40 लाख मोबाइलचे वितरण करत आहोत.
पुढील टप्प्यात 80 लाख मोबाइलचे वितरण केले जाणार आहे. मी अर्थसंकल्पात केलेली घोषणा आज ठोस स्वरूपात अंमलबजावणी करत आहे. आपण जी आश्वासने देतो, ती पाळतो, हा आपल्या सरकारचा मोठा गुण आहे.
आतापर्यंत आम्ही दिलेली 50 टक्के आश्वासने पूर्ण झाली आहेत. सप्टेंबरपर्यंत सुमारे 70 टक्के आणि डिसेंबरपर्यंत सुमारे 90 टक्के आश्वासने पूर्ण होतील. हा देखील एक भारतातला विक्रमच आहे.
गेहलोत म्हणाले, स्मार्टफोन देण्यासह आम्ही कुठे रस्ते तर कुठे पीएचसी, सीएचसी बांधत आहोत. जिल्हा रुग्णालये सुरू होत आहेत, शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. आम्ही थेट प्राथमिक शाळेला वरिष्ठ माध्यमिक शाळा बनवत आहोत. संपूर्ण राज्यामध्ये 1.48 लाख किलोमीटरचे रस्ते बांधले जात आहेत. “चिरंजीवी योजने’शी संबंधित असलेल्या 1 कोटी 35 लाख भगिनी, माता आणि मुलींना मोबाइल फोन मिळणार आहेत.
एक चिप आहे ज्याद्वारे मोबाईल फोन बनवले जातात, कारही आपोआप धावतात, संगणकही त्याद्वारे चालतात. कोरोनाच्या आगमनानंतर जगभरात चिप्सचे संकट आले. त्यामुळे मोबाईल बनणे बंद झाले होते. कार्स विकणे बंद झाले होते. आम्हीही या संकटाचा बळी ठरलो आणि मोबाइल देण्यास विलंब झाला.
गेहलोत म्हणाले, सर्व बहिणींच्या हातात मोबाइल आले आहेत. आम्ही 40 लाख विधवा, अपंग कुटुंबे प्रथम निवडली आहेत. इंदिरा गांधी स्मार्ट फोन योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबापर्यंत मोबाईल पोहोचावा अशी आमची इच्छा आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे एक उत्तम माध्यम बनणार आहे.