नवी दिल्ली – आधीच कुनो राष्ट्रीय अभयारण्यात एकामागून एक चित्त्यांचे मृत्यु होत असताना आता मध्य प्रदेशात एका पट्टेरी वाघाचा संशयास्पद मृत्यु झाला आहे. मध्य प्रदेशला टायगर स्टेटचा दर्जा मिळाल्यावर राज्य सरकारच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. मात्र मंगळवारी सिवनी येथील पेंच नॅशनल पार्कमधून समोर आलेल्या बातमीने चिंतेच्या रेषा उमटल्या. सिवनी येथे वाघाची नखे आणि हाडे सापडली आहेत.
स्टेट टायगर स्ट्राइक फोर्स मध्य प्रदेश भोपाळ आणि टायगर स्ट्राइक फोर्स जबलपूर यांनी वनविभाग दक्षिण जनरल बालाघाट येथून संयुक्त कारवाई करून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून वाघाचे केस, हाडे आणि नखे जप्त करण्यात आली आहेत. ते अवैध धंदे करत होते. यावेळी वाघाचा सांगाडाही जप्त करण्यात आला. चौकशीत अटक आरोपींनी गुन्हा कबूल केला.
वाघाला विजेचा धक्का देऊन ठार केल्याचे त्यांनी कबूल केले. बारघाट प्रकल्प सर्कल, सिवनी येथील बहराई परिसरात त्यांनी वाघाची शिकार केली होती. हे आंतरराज्य टोळीचे काम असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत मोठे खुलासे होऊ शकतात, असा दावा राज्य टायगर स्ट्राईक फोर्सने केला आहे.