कराड – येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर सुरू असलेल्या कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवास लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखान्यांचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक आणि अन्य मान्यवरांनी भेट दिली. हा महोत्सव राज्यातील शेतकर्यांसाठी दिशादर्शक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कृष्णा कृषी परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या या महोत्सवासाठी राज्यातील साखर कारखान्यांच्या पदाधिकार्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना, विलास साखर कारखाना, जागृती शुगर्स, मारुती महाराज साखर कारखाना, ट्वेंटी वन शुगर्स, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक अशा 93 मान्यवरांनी गुरुवारी महोत्सवाला भेट दिली. त्यांनी विविध स्टॉल्सची पाहणी करून, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले म्हणाले, मांजरा परिवार हा देशात सर्वोत्कृष्ट आहे. सहकारात जबाबदारीने काम करणारी नेतेमंडळी या परिवारात आहेत. या परिवाराचे सर्वेसर्वा असलेले विलासराव देशमुख यांनी राज्याचे दीर्घकाळ नेतृत्व केले होते. सहकार क्षेत्रासाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले होते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्या भागात चांगले काम सुरू आहे.
लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशल्य उटगे, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाइस चेअरमन आनंदराव देशमुख, विलास साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन रवींद्र काळे, जागृती शुगर्सचे व्हाइस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, बाजार समितीचे सभापती जगदीश बादणे, उपसभापती सुनील पडिले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, संचालक दिलीप पाटील, संभाजीराव सूळ, माजी व्हाइस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन गणपतराव बाजुळगे, मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष चांदपाशा इनामदार, रामदास पवार, शिवाजीराव कांबळे, आबासाहेब पाटील, श्याम भोसले व विविध पदाधिकार्यांचा डॉ. भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
माजी आमदार भिसे म्हणाले, मराठवाडा हा कमी पर्जन्यमानाचा भाग आहे; परंतु विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासारखे नेतृत्व लाभल्याने या भागात संपन्नता आली आहे. तुमच्या भागात मुबलक पाण्यामुळे सुबत्ता लाभली आहे. नदीत खळाळणारे पाणी पाहून आम्ही तृप्त झालो. भोसले कुटुंबाने शेतकर्यांचे हित समोर ठेवून या भागाचा केलेला विकास कौतुकास्पद आहे. कृष्णा कारखान्याचे व्हाइस चेअरमन जगदीश जगताप यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. श्रीरंग देसाई यांनी आभार मानले.
प्रारंभी मान्यवरांनी प्रीतिसंगमावर जाऊन लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. दरम्यान, या मान्यवरांचे कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले, डॉ. अतुल भोसले, सौ. गौरवी भोसले, विनायक भोसले उपस्थित होते.