कोल्हापूर – पाठलाग करत पाच लुटारूंनी दोघा व्यापारी बंधूंना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील १ लाख ४५ हजार रुपये असणारी बॅग लंपास केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव येथील पुलाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी ज्ञानराज नारायण नाडार (वय.३४ रा. उचगाव. ता.करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मूळचे तामिळनाडू राज्यातील मल्लियन कुडी येथील ज्ञानराज नारायण नाडार व त्यांचा भाऊ अभूराज नाडार हे दोघे गेल्या काही वर्षापासून करवीर तालुक्यातील उचगाव येथे राहतात. त्यांचा तावडे हॉटेल जवळ गोळ्या बिस्किटे विक्री करण्याचा किरकोळ व घाऊक व्यवसाय आहे. काल( शुक्रवारी) रात्री दुकान बंद करून ज्ञानराज नाडार व अबुराज नाडार हे दोघे त्यांच्या मोटरसायकलवरून दुकानातील एक लाख 45 हजार रुपयांची रक्कम बॅगेमध्ये घेऊन उचगाव येथील घराकडे जात होते. ते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव पुलाजवळ आले होते.
त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दोन मोटरसायकलवरून आलेल्या पाच जणांनी नाडार बंधू यांना थांबवुन, नाडार बंधूना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील १ लाख ४५ हजार रुपये असलेली बॅग जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केले.याबाबतची माहिती नाडार बंधूनी आपल्या नातेवाईकांना फोनवरून कळवली. त्यानंतर या दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.याप्रकरणी आज ज्ञानराज नाडार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यांमध्ये पाच लुटारूंच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.