नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने अखेर अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माबाबत वाद निर्मण करणारे माजी कसोटीपटू फारुख इंजिनिअर यांना कठोर शब्दात फटकारले आहे. निवड समितीवर टीका करताना विनाकारण अनुष्काला त्या वादात कशासाठी ओढले अशी संतप्त विचारणा कोहलीने केली आहे.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेदरम्यान निवड समितीचे सदस्य अनुष्काला चहा देत होते, तसेच ते कप उचलत होते अशी शेरेबाजी इंजिनिअर यांनी केली होती, त्यावेळी खुद्द अनुष्काने देखील आपली बाजू स्पष्ट केली होती, त्यावेळी कोहली क्रिकेटमध्ये व्यस्त होता, मात्र आता त्याने आपल्या पत्नीला विनाकारण वादात कशासाठी ओढले, जर तुम्हाला निवड समितीवर टीका करायची होती, तर ती वेगळ्या पद्धतीनेही करता आली असती, असे सांगत इंजिनिअर यांच्यावर पलटवार केला आहे.
इंजिनिअर यांचे आरोप अनाकलनीय आणि संभ्रम निर्माण करणारे आहेत. त्यात अनुष्काला विनाकारण सॉफ्ट टार्गेट करण्यात आले आहे, यापुढे इंजिनिअर काळजी घेतील अशी अपेक्षा आहे, असे मत कोहलीने व्यक्त केले आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहण्यासाठी अनुष्का फॅमीली बॉक्समध्ये बसली होती.
त्यावेळी निवड समिती सदस्य तीचा पाहुणचार करण्यात गर्क होते, ते तीला चहा आणुन देत होते, तसेच रिकामे कप देखील उचलत होते, असे इंजिनिअर यांनी सांगितले होते, मात्र त्यानंतर जेव्हा अनुष्काने आपली बाजू मांडली तेव्हा इंजिनिअर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत सारवासारव केली होती. इंजिनीअर यांनी सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रकार यापुढे थांबवावा असा टोलाही कोहलीने मारला.