आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : कोरोना विषाणूने राज्यासह देशभरात आता चांगलेच पाय पसरले आहेत. त्याच संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. राज्यातील परिस्थिती संवेदनशील आहे. नागरिकांनी गर्दी टाळली पाहिजे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे, याचा पुनरुच्चार राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी केला. त्याचबरोबर 15 दिवस कॉर्पोरेट क्षेत्रातील अत्यावश्यक काम वगळता इतर कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन या क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयातही कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार केले जातील. यावर कोणतेही बंधन नाही. फक्त संबंधित रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध असली पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. संशयित रुग्ण खासगी रुग्णालयामध्येही उपचारांसाठी जाऊ शकतात. प्रत्येकवेळी सरकारी रुग्णालयात गेले पाहिजे, असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे यांनी मंगळवारी सकाळी राज्यातील कॉर्पोरेट, बॅंकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यामध्ये कोरोना विषाणू संदर्भात या कंपन्या आपल्या कामाच्या ठिकाणी काय उपाययोजना करताहेत. त्यांनी काय केले पाहिजे. कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याला मंजुरी दिली पाहिजे, यावर चर्चा झाल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
बैठकीत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. जिथे कर्मचाऱ्यांना कामावर येणे आवश्यक आहे. तिथेच त्यांना बोलावले जाणार आहे.उर्वरित सर्वांना घरातून काम करण्यास सांगितले जाईल, असे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.