संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत असून, पुढील निवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. “मला बी सदस्य व्हायचय’ असे म्हणत, अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, नेत्यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे. निवडणुकीची घोषणा झाली नसली, तरी आगामी निवडणूक “हाय व्होल्टेज’ होण्याचे संकेत आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला घेरण्यासाठी विरोधक मोर्चेबांधणी करत आहेत.
पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ 13 मार्चला, तर जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ दि. 21 मार्चला संपत आहे. कार्यकाळ संपण्यास काही दिवस बाकी असले, तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे दिसत नाही. कच्चा प्रारुप प्रभाग आराखडा निवडणूक आयोगास सादर करण्यात आला आहे.
हा आराखडा जाहीर करण्यात आलेला नाही. आराखडा जाहीर केल्यानंतर त्यावरील हरकतींवर सुनावणी होऊन प्रभागरचना जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांची आरक्षण सोडत मंत्रायलयातून राबवण्यात येते. ही प्रक्रियादेखील झालेली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदांची आरक्षण सोडतही झालेली नाही. ओबीसी आरक्षणाचा तिढा अजून सुटला नसल्याने, निवडणुका लांबण्याची चिन्हे सध्या आहेत.
त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे 64 गट आणि पंचायत समितीचे 128 गण होते. शासनाच्या नव्या धोरणानुसार जिल्ह्यात दहा गट व 20 गण वाढणार आहेत. फलटण, सातारा, कराड प्रत्येकी दोन, कोरेगाव, माण, खटाव, पाटण प्रत्येकी एक, असे गट वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार असून, सर्वांच्या नजरा त्याकडे आहेत. जिल्ह्यात 74 गट आणि 148 गण होणार असल्याने इच्छुकांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.
आरक्षण काय पडणार यावरही अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. आता चित्र काही अंशी बदलले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीची पूर्वीची ताकद आता राहिली नसल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील तीन खासदारांपैकी दोन खासदार भाजपचे, तर एक राष्ट्रवादीचा आहे. विधानसभा मतदारसंघांपैकी फलटण, वाई, कराड उत्तर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस, माण, सातारा येथे भाजप आणि पाटण, कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज्यात भाजप सत्तेत नसला, तरी या निवडणुकीत जोरदार तयारी करताना दिसत आहे.
“मनी अँड मसल पॉवर’ दिसणार
जिल्हा परिषद व पंचायत समितीवर निवडून येणे आता तितके सोपे नाही. यापूर्वी कमी खर्चात निवडणुका होत होत्या. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते निष्ठा जपून प्रामाणिकपणे काम करत होते; परंतु गेल्या काही निवडणुका पाहिल्या असता, “मनी अँड मसल पॉवर’चा वापर अधिक दिसून येतो. आगामी निवडणुकांमध्येही हीच स्थिती असण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसांत निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी सत्ता राखणार की, त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात विरोधकांना यश मिळणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.