मुंबई – “मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. शेवटी पक्षाचा निर्णय असतो. पक्ष विशिष्ट पद्धतीने काम करत असतो. अनेक ठिकाणी न्यायालयीन कारवाई सुरू झाली आहे. न्यायालयात खटला सुरू असताना त्यावर बोलणे बरोबर नाही,’ असे मत भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशावर व्यक्त केले आहे.
दरम्यान, सोमय्या पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वाला कलंक लावला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला उद्धव ठाकरेंनी तिलांजली वाहिली आहे.
उद्धव ठाकरेंनी अमरावती आणि नागपूरमध्ये झालेल्या सभेत किरीट सोमय्यांचा उल्लेख “उपरा’ असा केला होता, त्यावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
गेली काही दिवस अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजप नेते किरीट सोमय्या यांना ट्रोल करण्यात येत आहे.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांनी आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते मुंबईतील माहिम रेल्वे स्टेशन इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 17 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमानंतर मीडियाशी ते बोलत होते.