श्रीनगर :- भाजपला सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत आपला पराभव होणार असल्याचे स्पष्ट दिसून आले असून त्यामुळेच त्यांनी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा दावा नॅशनल कॉन्फरन्स नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.
गेल्या 5-8 वर्षांत, भाजपने आपल्या मित्रपक्षांशी कुठेही “मैत्रीचा आदर केला नाही” परंतु आता “मजबूरीतून” त्यांना जुने मित्र शोधण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजप ज्या पद्धतीने एनडीएला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे त्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी सुचना त्यांनी अन्य विरोधी पक्षांना केली.
ते म्हणाले की, मधल्या काळात भाजपचे एनडीएतील एक एक करून मित्र निघून गेले. शिवसेना किंवा अकाली दल किंवा इतर पक्षांसारखे त्यांचे जुने मित्रही त्यांच्या बरोबर राहिलेले नाहीत.त्यामुळे त्यांना आता एनडीएचे पुनरूज्जीवन करण्याखेरीज पर्याय राहिला नाही. त्यामुळेच भाजपचे लोक आता आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी बोलत आहे आणि पंजाबमध्ये अकाली दलाला परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.पण ते काहीही झाले तरी सन 2024 ची निवडणूक त्यांना सोपी नाही असेही ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
समान नागरी कायद्याच्या संबंधात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या प्रकरणातील त्यांचा नेमका काय प्रस्ताव आहे हे आधी समोर येणे गरजेचे आहे. तोपर्यंत आम्हाला त्यावर काहीही बोलता येणार नाही.