मुंबई : राज्यात सध्या भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, याच प्रकरणात काल सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच आज पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचेही उत्तर देणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत. संजय राऊतांनीही वारंवार सोमय्या फरार असल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता. अशातच मुंबई उच्च न्यायालयाने काल अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.
आज पत्रकार परिषद घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्यांनी “उद्या नवा घोटाळा उघडकीस आणणार” असल्याचे वक्तव्य केले आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्राचा अभिमान आहे. त्यामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबई केंद्रशासित होणार नाही, ही स्टंटबाजी करुन संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यावरुन घोटाळ्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. ” पुढे बोलताना उद्धव साहेब उद्या तुमच्या कुटुंबाचा आणखी एक घोटाळा जनतेसमोर उघडकीस आणणार आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. तसेच, घोटाळेबाजांकडील पैसा पुन्हा जनतेच्या तिजोरीत जमा करणं हा माझा धर्म आहे, कर्तव्य आहे, असंह ते म्हणाले.
“ठाकरे सरकारमधील एक डझजन लोकांची प्रॉपर्टी अटॅच झाली आहे. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिक, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अनंतराव अडसूळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झाली आहे. नियमांप्रमाणे मी किंवा वकील जाऊ शकतात. आम्ही कोर्टात सगळी माहीती देत आहोत, 1997-98 पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली. विक्रांतचा कार्यक्रम सिंबॉलिक होता. विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. 1997 सालापासून सुरुवात केली आहे. संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात.”, असं किरीट सोमय्या म्हणाले.