पिंपरी(प्रतिनिधी)– टपरीवर झालेल्या उधारीच्या कारणावरून चार जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तसेच एकाला दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी अडीचच्या सुमारास चांदणी चौक, बावधन येथे घडली. अक्षय विक्रम वाल्हेकर (वय 23) असे अपहरण झालेली तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राम राजकुमार पाटील (वय 29), राहुल बालाजी बंडगर (वय 22), तौसिफ़ राजू इनामदार (तिघे रा. मुळशी), प्रवीण भोसले (रा. पिरंगुट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय वाल्हेकर आणि आरोपी राम याचा मेव्हणा यांच्यामध्ये टपरीवरील उधारीच्या कारणावरून भांडण झाले होते.
भांडणाचा राग मनात धरून आरोपी राम त्यांच्या तीन साथीदारांसह मोटारीतून आला. त्याने अक्षय वाल्हेकर याला जबरदस्तीने मारहाण करून मोटारीत बसविले. त्याला फिर्यादीने विरोध केला असता आरोपींनी त्यांना देखील दगडाने मारून जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.