कराची –आयसीसीवर दबाव टाकत असलेल्या बीसीसीआयला आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाने कोंडीत पकडण्याची तयारी सुरू केली आहे.
ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा रद्द झाली तर आयपीएलचे आयोजन करण्याबाबत तयारी करत असलेल्या बीसीसीआयला पाक मंडळाने कोणत्याही परिस्थितीत आशिया करंडक
स्पर्धेच्या आयोजनासाठी आग्रह धरून अडथळे निर्माण करण्याचा डाव सुरू केला आहे. आयपीएल जर यंदा रद्द करावी लागली तर बीसीसीआयला जवळपास 5 हजार कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे.
त्यासाठीच बीसीसीआय आयसीसीवर दबाव वाढवत आहे.
ऑस्ट्रेलियात येत्या 18 ऑक्टोबरपासून टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. मात्र, करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने या स्पर्धेचे आयोजन शक्य नसल्याचे संकेत त्यांनी आयसीसीला दिले होते, त्यामुळे त्याच विंडोत आयपीएलचे आयोजन होऊ शकते, असे मत बीसीसीआयने व्यक्त केले होते.
अर्थात, यंदाची आयपीएल भारतात घेण्याची तयारी केली तरी सर्व सामने दक्षिण भारतातच घ्यावे लागणार आहेत. अन्यथा अमिराती व श्रीलंका क्रिकेट मंडळांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार करत या दोन देशांपैकी एका ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करावी लागेल.
एकीकडे प्रयत्न सुरू असताना पाकिस्तान मंडळ मात्र, आशिया करंडक स्पर्धेसाठी आग्रही आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते तेव्हापासून बीसीसीआयने पाकिस्तानात खेळणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. दोन्ही देशांमध्ये सध्या तणाव असून केंद्र सरकारही भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्याची परवानगी देणार नाही.