वाल्हे: पुरान प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तेन्हीं लोक उद्धरती ||रामायणाचे रचणाकार, आद्यकवी, महर्षि वाल्मिकीऋंशीच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या वाल्हे नगरीमध्ये आज रोजी आगमन होणारा संत क्षेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा यावर्षी दिसला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याने महर्षि वाल्मिकीऋशीच्या संजीवनी समाधी मंदिर परिसरामधील वाल्हे नगरीमध्ये आज वैष्णवांच्या महासागराविना, तसेच माऊलींच्या पालखी सोहळ्यातील दुपारी होणारी समाज आरती, त्यानंतर वैष्णवांच्या महाप्रसादाच्या पंगती, व नंतर भजनाच्या आनंदामध्ये रंगणारे वैष्णव मात्र यावर्षी कोरोनाच्यामुळे रद्द करण्यात आलेल्या पायी पालखी सोहळा वाल्हे (ता.पुरंदर) मुक्कामी येऊ शकत नसल्याने अनेक वर्षापासूनची माऊलींच्या पालखी सोहळ्याची परंपरा यावर्षी खंडीत झाली आहे.
यावर्षी माऊलींचे आगमन न झाल्याने, महर्षि वाल्मिकीऋशीची वाल्हे नगरी सुनी- सुनी वाटत आहे. वाल्हे नगरीमध्ये पहिल्यांदाच वैष्णवांचा महासागर नसणार आहे .
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीन गरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास, टाळ मृदुंगाचा गजर, व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा दरवर्षी वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होतो. सह्याद्रीच्या पहुडलेल्या वाटांनी प्रवास करताना, भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत, वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होतानाच, सकाळची न्याहरी, सह्याद्रीच्या पर्वत रागांच्या कुशीमधील दौंडज खिंडीमध्ये घेऊन, क्षणभर विश्रांती घेत, वाल्हे नगरीकडे मार्गस्थ होतो.
सकाळी अकराच्या दरम्यान वाल्मिकीच्या नगरीमध्ये माऊलींचे आगमन होते. आगमनानंतर वाल्हे गावमधील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माऊलींच्या रथावरती पुष्पवृष्ठी करत स्वागत केले जाते. दुपारी बारा – साडेबारा पर्यंत पालखी सोहळा पालखी तळावरती पोहचतो. नंतर दुपारीची समाजआरती होऊन पालखी मुक्कामी विसावली जाते. माञ कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्वच पालखी सोहळे रद्द करण्यात आल्याने यंदा वाल्हे नगरीला वैष्णवांच्या सेवेची संधी मात्र मिळाली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी, कोरोनाच्या संकटामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतही केले आहे.
दरवर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी अनेक जन वर्षभर तयारी करतात. पालखी सोहळा ज्या गावामधून मार्गस्थ होत असतो त्या गावांमधील अनेक व्यवसायिक पालखी सोहळ्याच्या दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल करतात. अनेक व्यावसायिकांचे वार्षिक उत्पन्न पालखी सोहळा मार्गस्थ होत असतानाच दोन दिवसामध्ये वर्षभराचा आर्थिक व्यवसाय होतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामध्ये पालखी सोहळा रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांचे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत यावर्षी नाहीसा झाला आहे. त्यामुळे अनेकांची वर्षभराची आर्थिक गणिते बिघडली आहेत.
वाल्हे येथील पालखी तळाकडे जाण्यासाठी आगोदर रेल्वे पटरी ओलांडून जावे लागत होते. त्यामध्ये रेल्वे आल्यावर रेल्वे गेट बंद करण्यात येत असल्याने वैष्णवांची गर्दी जास्त होत होती. तसेच याठिकाणी अनेक अपघात होत होते. त्यामुळे मागील वर्षी पालखी सोहळ्यासाठी रेल्वे पटरीच्या खालून,भुयारीमार्गाचे काम केल्याने, पालखी तळाकडे जाण्यासाठी सोपा व सोईचा मार्ग झाला आहे.
वाल्हे नगरीमध्ये प्रशस्त असा पंधरा एकरमध्ये शासनाच्या मालकीचा पालखी तळ आहे. वाल्हे येथील पालखी तळ, सुशोभित करणासाठी शासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये, दोन स्वागत कमानी, संरक्षण भिंत, तसेच पालखी विसावा ओटा, हायमासट दिवे असा, अनेक सेवा परिपूर्ण असा वाल्हे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळ असून यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामुळे प्रशस्त असा पालखी तळ वैष्णवांच्या कमी मुळे सुना- सुना वाटत आहे.