वाल्हे: अनेक वर्षे दुष्काळी तालुका म्हणून पुरंदर तालुक्याची ओळख आहे. मागील आठवड्यामध्ये निसर्ग चक्रिवादळामुळे सगळीकडे जोरदार पाऊस सुरू होता. मात्र पुरंदर तालुक्यातील वाल्हे गाव पेरणी युक्त पावसाच्या प्रतिक्षेत होते. मागील दोन-तीन दिवसापूर्वी पेरणी युक्त पाऊस झाल्याने, अनेक शेतकरीवर्गाची पेरणीची लगबग सुरू असल्याचे परिसरामध्ये दिसत आहे.
बाजरीचा आगारा असलेल्या या परिसरामध्ये ८६५ हेक्टर क्षेत्रामध्ये बाजरीची पेरणी केली जाते. यावर्षी शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र यावर्षी मान्सून पूर्व पाऊस वाल्हे परिसरामध्ये अत्यंत कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी १ जुलैची ऊसाची लागवड करावी की बाजरी उत्पन्न घ्यावे, या द्विधा मनःस्थितीत आहेत.
अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने,व पुढे होईल की नाही याचा भरोसा नसल्याने, थोड्या पाण्यावर बाजरीचे पिक येऊ शकते. या आशेवर अनेक शेतकरी बाजरीची पेरणी करत आहेत. अनेकांनी बाजरी पेरणी साठी धावपळ सुरू झाली आहे.
काल पासून पावसाने थोडी उघडीप दिल्याने अनेक शेतक-यांनी पेरणीची तयारी सुरू केली.
मागिल वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने अनेक शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच अनेक शेतक-यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साठवून राहिले. साठलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे अनेकांची पिके शेतामध्येच कुजून गेली होती. नोव्हेंबर नंतर पाऊसाने उघडीप दिल्याने अनेक शेतक-यांनी झालेल्या नुकसानीतुन सावरत पुढील शेतीची कामे सुरू केली.
दोन-तीन महिन्यामध्ये शेक-यांच्या शेतामधील शेतमाल, अवकाळी पावसानंतर विक्रीसाठी उपलब्ध असताना जगावर कोरोनाचे संकट आले. या संकटामुळे शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आला. शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकरीवर्गाने मोठे आर्थिक नुकसान झाले.
कोरोनाच्या संकटामध्ये यावर्षी अनेक शेतक-यांच्यावर आर्थिक संकट आहे. मात्र पाऊस सुरू होईल या आशेने, शेतकऱ्यांनीही मशागतीची कामे वेगाने केली. उसनवारी करून खते, बियाण्यांचे नियोजनही केले. शेतकरी पेरणीच्या तयारीत असतानाच अचानक पावसाने दडी मारली होती. मागील, दोन-तीन दिवसापुर्वी पेरणी युक्त पाऊस झाल्याने, येथील शेतकरी पेरणीपुर्व शेतीची कामे, करताना दिसत आहे. पेरणीपुर्वी शेतीची मशागतीची कामे पूर्ण करताना दिसत आहेत. यामध्ये काकरणी, कुळवपाळी, व नंतर पेरणी करताना शेतकरी वर्ग दिसत आहे.
वाल्हे परिसरामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने,बाजरी, सूर्यफूल,मुग,मटकी, चवळी, तुर,भुईंमुग,उडीद आदी पिके घेतली जातात.