मुंबईः विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास एक महिना चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर महिविकास आघाडीची राज्यात सत्ता स्थापन झाली, आणि सर्वात अधिक जागा मिळूनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं आहे. त्यानंतर भाजपांतर्गत नाराजीने डोके वर काढायला सुरवात केली आहे.
त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये असणारी नाराजी हळू हळू समोर येण्यास सुरवात झाली आहे. निवडणुकीच्या काळात भाजपानं एकनाथ खडसेंना जाणूनबुजून बाजूला ठेवले. तर तिकीट वाटपात डावलल्यानंतर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मनात देखील नाराजीची भावना आहे. त्याच पार्श्वभूमीवर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे अशा नेत्यांनी भाजपांतर्गत दबाव वाढवण्यास सुरुवात केली असल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच आज एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंची बैठक झाली आहे. त्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगण्यास सुरवात झाली आहे.
बैठकीनंतर बाहेर आल्यावर खडसेंनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बैठकीत काय चर्चा झाली असे पत्रकारांनी विचारले असता खडसे म्हणाले, पारिवारिक चर्चा झाली. आमच्याकडे एक कार्यक्रम आहे. परिवारातल्या सदस्यांना आमंत्रण द्यायला बोलावलं होतं. तसेच भाजपासमोर काहीही आव्हानं नसल्याचा खुलासाही खडसेंनी यावेळी केला आहे. भाजपासमोर काहीही आव्हान नाही, भाजपा पक्ष सध्या तरी एकसंध आहे.
पक्षामध्ये एकजूट आहे आणि योग्य वेळी तुम्हाला दिसून येईल. जस जशा निवडणुका येतील, त्या त्या वेळी योग्य काय ते दिसून येईल. पंकजाताईंची काही भेट घेतलेली नाही. पंकजाताईंची भेट घेण्याची काही आवश्यकता नाही. गोपीनाथ गडावर दरवर्षी जातो आणि आताही जाणार आहे. या वर्षीसुद्धा जाणार आहे. सध्या तरी वेगवेगळे मतप्रवाह समोर आलेले नाहीत. मीडियाच्या माध्यमातून बरीचशी माहिती समजल्याचाला टोलाही खडसेंनी लगावला आहे. तर विनोद तावडेंनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.