नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा आवाज देशभरात पोहचू नये यासाठी त्यांना तुरूंगात धाडण्यात आले. मात्र, केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता त्यांचा आवाज बनतील, अशी भूमिका आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी गुरूवारी मांडली.
दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने मागील महिन्यात केजरीवाल यांना अटक केली. ऐन निवडणूक काळात ती कारवाई झाली. केजरीवाल हे आपचे सर्वांत प्रभावी स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या अटकेमुळे आपची प्रचार मोहीम प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी राय यांनी केजरीवाल यांच्या पत्नीचे आपच्या दृष्टीने असणारे महत्व अधोरेखित केले. केजरीवाल यांचा संदेश सुनीता देशात गरज असेल तिथे पोहचवतील, असे त्यांनी नमूद केले.
केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील जनता ठामपणे आप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभेच्या सर्व ७ जागांवर भाजप पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे, असा दावाही राय यांनी केला.