नाणे मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात घरटी बैल जोडी पाळली जाते. काही शेतकरी बांधब बैलाचा वापर हा शेती व शर्यतीसाठी करतात. मावळ तालुक्यात व महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत हा पारंपरिक आहे. मात्र, धडे गिरवण्याची वयात मुलांच्या हातात कासरा आला आहे. शिक्षणापेक्षा बैलगाडा शर्यतीकडे मुले जास्त लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे या मुलांच्या भवितव्याची चिंता व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यात पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. या शर्यतीला सुमारे ४०० वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून शेतामध्ये ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे शेतकऱ्यांकडे टिकून आहे.
पुणे जिल्ह्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदाने खेळला जातो. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात यात्रानिमित्त अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी व बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी अनेकजण जातात. ग्रामीण भागातील अर्थकारण हे या खिल्लार बैलांच्या शर्यतींवर अवलंबून असते.
ज्या वयात शिक्षणाचे धडे गिरवण्याची असते त्या वयात मुलांच्या हातात बैलाचा कासरा आला आहे. ज्या वयात लेखकांची नावे पाठ करायची, त्या वयात बैलगाडा मालक व त्यांच्या बैलाच्या नावासह त्यांची नावे तोंडपाठ आहेत. ज्या वेळी कविता पाठ करायच्या त्या वयात बैलगाडा मालकांची घोषणाबाजी न चुकता करताना दिसत आहेत. त्यामुळे बैल असणाऱया शेतकऱयांचे मुलांचे भवितव्याची चिंता व्यक्त केली जात आहे.