पवनानगर, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड व मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ४६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी केले आहे. संपूर्ण राज्यात सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आगामी काळातील पाण्याचे संकट लक्षात घेता शासनाने अनेक ठिकाणच्या बोरवेल आणि विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे बाष्पीभवन होणार आहे. त्यातही एरव्ही ७ जून रोजी सुरू होणारा पावसाळा लांबत चालला आहे. अनेकदा जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू होतो. अशावेळी जर पावसाळा लांबला तर पिंपरी चिंचवडकरांवर पाण्याचे संकट येऊ शकते.
सध्या पिंपरी चिंचवड शहराला दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळ्या सुरू झाल्यापासून अनेक भागात कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. याबाबत महापालिकेकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. काही भागांमध्ये पाणी कमी येत असल्याने नागरिक नळाला टुल्लू मोटार लावून पाणी खेचून घेतात. यामुळे आगामी काळात आणखी तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.
मावळसह पिंपरी चिंचवड शहराचा पाण्याचा मुख्य स्रोत म्हणून पवना धरणाकडे पाहिले जाते. धरणाची पाणी साठवन क्षमता ८.१ टीएमसी आहे. आजअखेर पवना धरणामध्ये ४५.५४ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पवना धरणाची पाणी पातळी ६०६.३७ मीटर आहे.
तर उपयुक्त पाणीसाठा ११२.१७ फूट इतका आहे. हा पाणीसाठा जूनअखेर पर्यंत पुरेल. मात्र, पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाई जाणवू शकते. तसेच नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी केले आहे.
संभाव्य पाणी टंचाईवर काही उपाययोजना
– पाण्याचा गैरवापर टाळा
– पाण्याचा पुनर्वापर करा
– अंघोळ बादलीभर पाण्यातच संपवा
– शाॅवरचा उपयोग शक्यतो थांबवा
– नळाच्या तोट्यांची दुरूस्ती करून घ्या
– नळाच्या पाण्याद्वारे गाड्या धुणे थांबवा
– जनावरांनाही नळाच्या पाण्याने अंघोळ घालू नका
– वॉश बेसिनवरील नळ सुरू ठेवून तोंड धुणे टाळा
– सार्वजनिक नळाचे पाणी धो–धो वाहात असेल तर प्रशासनाला कळवा
– कुलरचा वापर काळजीपूर्णक करा
– स्वतःला पाणी बचतीची सवय लावा व इतरांनाही महत्व सांगा