नाणे मावळ, {अतुल चोपडे} – महाशिवरात्रीनंतर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात आत्तापर्यंत चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे. दुपारी बारा ते चार वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जास्त जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३५ अंश सेल्सिअस असणारे तापमान आता मात्र ४० अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे, त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करीत आहेत.
दुपारी उन्हाचा जोर जास्त असल्याने तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सामसूम दिसून येत आहे. उन्हापासून व उकाड्यापासून बचावासाठी पंखे, कुलर, एसीची मदत घेतली जात आहे. कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक उन्हापासून बचावासाठी टोपी, स्कार्प, रुमाल, गॉगल, छत्री वापरू लागले आहेत.
उत्तरेकडून येणारे थंड वारे कमी झाल्याने पुढील काळात हवामान कोरडेठाक राहणार असल्याने उन्हाचा कडाका आणखी वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. यापुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हात कामे करणे टाळावेत.
कडक उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांनी उष्माघात होऊ शकतो. नागरिकांनी उन्हामध्ये जाणे टाळावे, शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याची दक्षता घ्यावी व उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात जावे, असा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
उष्माघाताची कारणे
भर उन्हात काम करणे, उन्हाळ्यात मद्यपान व कॅफेनयुक्त पेये पिणे, दुपारच्या वेळी पुरेसे पाणी न पिणे, व्यायाम करणे, यामुळे उष्माघात होतो. तसेच नवजात बालके लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृद्ध मंडळी या व्यक्तीमध्ये उष्माघाताची जास्त शक्यता असते.
उपाय
उन्हाळ्यामध्ये पुरेशी पाणी प्यावे, फळाहार किंवा फळांचा रस पालेभाज्या, सॅलड घ्यावे, मद्यपान व कॅफिन घेणे टाळावे, ताक, उसाचा रस याचा आहारात उपयोग करावा. उन्हाळ्यात कष्टदायक कामे टाळावीत, दुपारी बारा ते चार या वेळेत कष्टदायक कामे करू नयेत. विश्रांती घ्यावी, सैल व सुती कपडे वापरावेत.
उष्माघाताची लक्षणे
थकवा येणे, तहान लागणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, अशी लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार न केल्यास जीभ कोरडी पडणे, रक्तदाब कमी होणे, हृदयात धडधड वाढणे, त्वचा लाल होणे, बेशुद्ध होणे, चक्कर येणे ही लक्षणे दिसल्यास वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.