नवी दिल्ली – निमलष्करी दलांतील 32 हजार 238 जवानांना करोनाची बाधा झाल्याची माहिती सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली.
याचा विस्तृत घोषवारा देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, जे एकूण जवान करोनाग्रस्त आहेत त्यातील 9158 जवान सीआरपीएफचे, 8934 जवान बीएसएफचे, 5544 जवान सीआयएसएफचे, 3380 जवान आयटीबीपीचे, 3251 जवान एसएसबीचे, 1746 जवान आसाम रायफल्सचे, आणि 225 जवान एनएसजीचे आहेत.
करोनाग्रस्त जवानांचा मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण सीआयएसएफ मध्ये आहे, तर त्या खालोखाल हे प्रमाण आसाम रायफल्स मध्ये आहे असे मंत्र्यांनी सांगितले.
ते म्हणाले की या जवानांच्या उपचारासाठी कोविड उपचार केंद्रे आणि कोविड केअर सेंटर्सची स्थापना करण्यात आली आहे. करोनामुळे मरण पावलेल्या जवानांच्या कुटुंबियांना त्यांच्या नियमीत नुकसानभरपाईसह प्रत्येकी पंधरा लाख रूपयांचा निधी भारत के वीर जवान फंडातून दिला जात आहे.