नवी दिल्ली – शेती विषयक तीन सुधारणा विधेयके संसदेत मंजुर होणे हा शेती क्षेत्रासाठीचा ऐतिहासिक क्षण आहे अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
त्यांनी ट्विटरवर या संबंधात प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, गेली अनेक दशके देशातील शेतकरी दलालांच्या कचाट्यात सापडला होता. पण संसदेत संमत झालेल्या विधेयकांमुळे त्यांची आता या कचाट्यातून सुटका झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या योजनेत ही विधेयके महत्वाची जबाबदारी पार पाडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या मदतीची मोठी गरज होती. ही विधेयके संमत झाल्याने त्यांना आता तंत्रज्ञानाची मदत अत्यंत सहजपणे घेता येणार आहे. त्यातून त्यांना उत्पादन वाढवता येईल आणि त्यांना स्वताची भरभराट साधता येईल.
या विधेयकांमुळे किमान आधारभूत किंमत जाहीर करणे थांबणार नाही, ती पद्धत सुरूच राहील आणि सरकारकडून शेत माल खरेदीची प्रक्रियाही सुरूच राहील असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. आम्ही येथे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच कार्यरत आहोत. त्यांचे हित साधणे हेच आमचे लक्ष्य आहे. शेतकऱ्यांच्या येत्या पिढ्या सुखाने राहिल्या पाहिजेत हे सरकारचे लक्ष्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे.