बेळगाव : कर्नाटकमध्ये दोन दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराचा जोर लावला जात आहेत. महाराष्ट्रातूनही काँग्रेस आणि भाजपाचे दिग्गज नेते कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यातच भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या कर्नाटक दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना “५० खोके वाले आज ४० टक्क्यांसाठी कर्नाटकमध्ये भाजपाच्या प्रचाराला गेले आहेत. खरं तर तिथे जाऊन त्यांनी सीमा भागातील मराठी बांधवांशी संवाद साधायला हवा होता, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिशी त्यांनी उभं राहायला हवं होतं. मात्र, मिंधे ते मिधेंच. केवळ स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी ते आपल्या बॉसचं ऐकून भाजपाच्या प्रचारासाठी गेले”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पुढे त्यांनी बारसू रिफायनरी प्रकल्पावरूनही शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले. “राज्य सरकार बारसूबाबत कोणतीही चर्चा करणार नाही. कारण हे लोक फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सत्तेत बसले आहेत. उद्धव ठाकरेही काल बारसूमध्ये होते. त्यावेळी त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना स्थानिकांविरोधात लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर न करण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र, हे सरकार कुणाचंही ऐकून घ्यायला तयार नाही. राज्यात एकप्रकारे हुकूमशाही सुरू आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मतभेद असून यापुढे त्यांची वज्रमूठ सभा होणार नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत असताना त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले. “विरोधकांना वज्रमूठ सभेचा धक्का बसला आहे. त्यामुळे ही सभा होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, खारघर सारखी घटना पुन्हा घडू नये म्हणून वज्रमूठ सभा उन्हाळ्यानंतर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची” प्रतिक्रिया त्यांनी दिली.