मुंबई – ऊन्हाचे चटके बसायला आता सुरुवात झाली आहे. रायगडच्या कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच कोकणातील अनेक भागातही उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेले आहे. परभणीत आज 38.02 अंश सेल्सिअस, वाशिममध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच मुंबईमध्ये 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर गेला आहे.
आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी इशारा जारी केला आहे. उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह, आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी मुंबईतील उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण दिले आहे. “येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावे”, असे त्यांनी ट्वीट करून म्हंटले आहे.