मुंबई : – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भर पावसात आपल्या कर्जत-जामखेड मतदार संघात एमआयडीसी स्थापन करण्यासाठी विधिमंडळाच्या प्रांगणात आंदोलन केले.
आता त्यांनी ज्या जमिनीवर एमआयडीसी स्थापन करण्याची मागणी केली, ती जागा “पीएनबी’ला कोट्यवधींचा चुना लावून पसार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी विधिमंडळात हा दावा केला आहे.
विधान परिषदेतील चर्चेदरम्यान शिंदे म्हणाले की, कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यात कुणाचेही दुमत नाही. येथील बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले पाहिजे. पण या जागेवर, याच ठिकाणी एमआयडीसी व्हावी असा आग्रह काहीजण का धरत आहेत?
येथील जमिनींचे मालक असलेल्या शेतकऱ्यांची नावे नीरव दीपक मोदी, मनिषा कासोले, नयन अग्रवाल, कमलेश शाह, पंकज विनोद खन्ना, गणेश अग्रवाल अशी आहेत. त्यामुळे आपण येथील बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी ही मागणी करत आहात की येथील उद्योजक व गुंतवणूकदारांच्या कल्याणासाठी करत आहात? अशी विचारणाही शिंदे यांनी यावेळी सभागृहात केली.
हे सर्वकाही धक्कादायक – उद्योगमंत्री
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या चर्चेला उत्तर दिले. ते म्हणाले की, जामखेड एमआयडीसीत उद्योग येण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. 2016 मध्ये कर्जत एमआयडीसीसाठी पहिली बैठक झाली. त्यानंतर स्थळपाहणी झाली. भूनिवड समितीनेही सकारात्मकता दाखवली.
तत्कालीन मृद् व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पत्र दिले. कर्जत, पाटेगाव, खंडाळा या भागाची भूनिवड समितीने पाहणी केली. पण येथील जमिनीचे मालक नीरव मोदी व अग्रवाल असे असणार असतील तर हे सर्वकाही धक्कादायक आहे. त्यामुळे ही जागा नेमकी कुणाची आहे? हा नीरव मोदी कोण आहे? तो लंडनला पळालेलाच नीरव मोदी आहे का? आदी गोष्टींची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले.