जामखेड – कुणी आपली प्रॉपर्टी वाचवण्यासाठी, तर कुणी आपले कारखाने वाचवण्यासाठी सत्तेत चालले आहे. मात्र सुज्ञ जनता या घोटाळेबाज नेत्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. पक्षाचा आदेश आल्यास कर्जत, जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले. कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जामखेड येथे प्रहार संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते.
यावेळी प्रहार संघटनेचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेशी, सचिव प्रकाश बेरड, महिला अध्यक्षा विमलताई अनारसे, तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, कर्जत तालुकाध्यक्ष राजेंद्र घोडेस्वार, सुदाम निकत, लोकाधिकार आंदोलनाचे अध्यक्ष ऍड. अरुण जाधव, सागर निकत, भीमराव पाटील, गणेश हगवणे, राहुल पवार, नय्यूम शेख, शिवाजी सातव, भानुदास बोराटे, गोरख शिंदे, शहाजी डोके, सुनील कथले, महेंद्र मोहळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत कोणी कसलेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले नाहीत. आता निवडणुका आल्या की तुम्हाला जाग आली का? असा प्रश्न संतोष पवार यांनी उपस्थित केला.