कराड – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील प्रभावी व्यक्ती असून जगातील दीडशे देशांनी मोदींना जगातील सर्वोत्तम नेता मानलेले असून 78 टक्के लोकांनी त्यांच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे. त्यांची प्रसिद्धी पाहून छाती फुगून 56 इंचाची होते. आजच्या या ‘घर चलो अभियानात’ तब्बल 1132 लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाला पसंती दर्शवली. इतरत्रही जनतेचा हाच कौल दिसत आहे. त्यामुळे देशभरासह सातारा लोकसभा, कराड दक्षिण, उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचेच कमळ फुलणार असल्याचा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
येथील चावडी चौकात बुधवारी ‘घर चलो अभियानांतर्गत’ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील, केशव उपाध्ये, माजी खा. अमर साबळे, विक्रम पावसकर, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, डॉ. अतुल भोसले, आ. जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, पै. धनंजय पाटील, एकनाथ बागडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. बावनकुळे म्हणाले, जनतेने कमळाला मत दिल्यावर मोदींच्या नेतृत्वाखाली कश्मीरमधील 370 कलम हटल्याने याठिकाणी तिरंगा फडकला. हे कलम हटवल्यास कश्मीरमध्ये रक्ताचे नद्या वाहतील, असे काहींनी म्हटले होते. परंतु, याठिकाणी एक दगडही कोणी मारला नाही. हीच मोदींची ताकद असून येत्या 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांचा इतिहास देशासमोर आणला जाणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून भाजप कार्यकर्त्यांनी रेल्वेने अयोध्येत यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, मोदींना हटवण्यासाठी 28 पक्ष एकत्र आलेत. उद्धव ठाकरेंनीही त्यांच्या पाठीत खंजीर खूपसला. पण, या बेइमानीचा लोकांनी बदला घेतल्याने त्यांचा धनुष्यबाणही त्यांच्यापाशी राहिला नाही. शरद पवार यांचीही घडी विस्कटली असून त्यांची घडी त्यांच्याजवळ राहणार नाही. अजित पवार यांचा आम्हाला अभिमान असून त्यांनी बेइमानी करणाऱ्यांना धडा शिकवत उशीर का होईना, पण भाजपला समर्थन दिले आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री उदय निधी यांनी 28 पक्षांचे सरकार आल्यावर देव, देश, धर्म व हिंदु संस्कृती संपवून टाकू, असे वक्तव्य केले आहे. परंतु, त्यांच्यासोबत असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना हे मान्य आहे का? हे त्यांनी सांगावे.
जर मान्य नसेल, तर त्यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडावे आणि जर त्यांना हे मान्य असेल, तर कराडची जनता त्यांना माफ करणार नसून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तसेच देशाला सर्वार्थाने समृद्ध करण्याचे स्वप्न नरेंद्र मोदींनी पाहिले असून अठरापगड जातींनी त्यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन पक्षाचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, नरेंद्र मोदींनी जगभरातील राष्ट्राध्यक्ष, नेत्यांशी संबंध प्रस्थापित केले आहेत. युद्ध बंद करायला लावून त्यांनी परदेशात अडकलेल्या नागरिक, विद्यार्थ्यांना सुखरूप देशात आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. सातारा लोकसभेसाठी पक्ष जो उमेदवार देईल, त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू. तसेच देवेंद्र फडणवीस यांना याआधी आम्ही नगराध्यक्ष, जि.प. व पं.स. सदस्य आणि अनेक विजयी सरपंच भेट म्हणून दिले असून प्रदेशाध्यक्षांना लोकसभेचा खासदार भेट देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी आ. बावनकुळे यांना दिली.
विरोधकांची अनामत जप्त होईल
नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांना समर्थन देण्यासाठी सर्वाधिक मतांनी विजयी झालेला सातारच्या खासदार लोकसभेत उपस्थित असेल. तसेच नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेत कराड दक्षिणचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अतुलबाबा भोसले आमदार म्हणून उपस्थित असतील. गतवेळी केवळ 9 हजार मते कमी पडली. मात्र, यावेळी तब्बल दोन लाख मतांनी अतुलबाबा निवडून येतील. त्यामुळे दक्षिणेतील विरोधकांची अनामत रक्कमही जप्त होईल, असा विश्वास आ. बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
घोषणाबाजी करून मते मिळत नाहीत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात अनेक कामे झाली आहेत. ही कामे घराघरात पोहचवण्यासाठी सरल पचे टार्गेट सर्वांनी पूर्ण करायचे आहे. केवळ घोषणाबाजी करून मते मिळत नाहीत. तसेच पक्षाचे विचारही घराघरात पोहोचणार नाहीत. असा टोला डॉ. अतुल भोसले यांनी स्थानिक भाजप नेत्यांना लगावला. याची चांगलीच चर्चा सभास्थळी सुरू होती.
====================