सातारा – सातारा आणि कराड रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास केला जाणार आहे. त्यात कराडसाठी 14 कोटी तर साताऱ्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामाला लवकर सुरुवात होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत देण्यात आली आहे.
पुणे येथे रेल्वे प्रबंधक कार्यालयाची बैठक झाली. या बैठकीत पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे, मुख्य वाणिज्य प्रबंधक डॉ. मिलिंद हिरवे, सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे, शैलभद्र गौतम, किशोर भोरावत, शिवनाथ बियाणी, निकित बशीर, बाबासाहेब शिंदे, सुरेश माने, दिलीप बटवाल, अजित चौगुले, मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. बैठकीत उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना इंदू दुबे यांनी कराड व सातारा स्थानकांचा अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकास केला जाणार असल्याचे सांगितले.
यामध्ये कराड रेल्वे स्थानकासाठी 14 तर सातारा रेल्वे स्थानकासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा, 24 तास मुबलक पाणी, रेल्वे स्थानकांचा प्रशस्त दर्शनी भाग, रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी, प्रवाशांसाठी बसावयाची बाकांची सुविधा, फलाटांचे प्रशस्तीकरण इत्यादी सुविधा दिल्या जाणार आहेत. या कामास लवकरच सुरुवात होणार आहे, असे मुख्य वाणिज्य प्रबंधक डॉ. हिरवे यांनी सांगितले.
काही गाड्यांचे थांबे वाढणार
कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करणे, दादर पंढरपूर एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करणे व कोल्हापूर सिकंदराबाद व्हाया कलबुर्गी साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करणे तसेच मिरज- पुणे, मिरज- कोल्हापूर या विभागांत काही एक्सप्रेस गाड्यांना वळिवडे, रूकडी, सांगली, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, तारगाव, सातारा, लोणंद, जेजुरी येथे थांबा देण्यात येणार आहे. काही स्थानकांवर हा थांबा सुरू झाल्याचे डॉ. स्वप्नील मीना यांनी सांगितले.