चेन्नई – संसदेवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत त्या बाबत निवेदन सादर केले पाहिजे अशी मागणी डीएमकेच्या खासदार कनिमोझी यांनी केली आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ही एक गंभीर सुरक्षा तृटी असून त्यावर गृहमंत्र्यांनीच सभागृहात बोलले पाहिजे अशी आमची मागणी आहे. सन २००१ साली संसदेवर झालेल्या हल्ला प्रकरणात लालकृष्ण आडवानींनी निवेदन केले होते आजही तसेच व्हावे एवढीच आमची मागणी आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की संसदेची नवीन इमारत देशातील सर्वात सुरक्षित इमारत असल्याचे सांगितले गेले होते. पण संसदेचे सदस्यही सुरक्षित नाहीत, आमच्या लोकशाहीच्या मंदिरावर कोणत्याही दिवशी हल्ला होऊ शकतो. ही घटना सुरक्षेतील त्रुटी दर्शवते. हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे धुराच्या डब्याऐवजी बंदुका किंवा स्फोटके असू शकली असती.
हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर संसदेची ही इमारत सदस्यांसाठीही सुरक्षित नाही असे स्पष्ट झाले आहेे. जेव्हा संसदेवर २००१ मध्ये, हल्ला झाला होता, तेव्हा तत्कालिन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी लोकसभेत निवेदन केले होते. त्यांनी या संबंधातील आपली जबाबदारी टाळली नव्हती. त्याच आधारावर आम्ही आता असेच स्पष्टीकरण मागत आहोत.
केंद्र सरकारने या घटनेची जबाबदारी स्वीकारून स्पष्टीकरण द्यावे.आम्ही सभागृहात हा मुद्दा लावून धरला त्यावेळी विरोधी पक्षांच्याच खासदारांना सभागृहातून निलंबीत करण्यात आले. सरकारच्या या कृतीवरही त्यांनी आक्षेप घेतला.