मुंबई -बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली आहे. प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली कारवाई ही कायदेशीरदृष्ट्या योग्यच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई अयोग्य आहे. त्यामुळे ती रद्द करावी अशी मागणी कंगनाने उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 1 सप्टेंबर रोजी राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला.
अख्तर यांच्यावतीने दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी केलेली कारवाई ही कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. तसेच अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे पूर्ण पालन करण्यात आले आहे, असा दावा केला. मात्र निव्वळ पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, न्यायालयाने स्वतंत्र चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला होता. मात्र, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.