मुंबई : अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेल्या कालीचरण महाराज यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यासोबतच कालिचरण यांनी राज ठाकरेंना हिंदुत्वाबाबत एक सल्ला दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सध्या चालू असणाऱ्या राजकीय महानाट्यासंदर्भात कालीचरण महाराजांनी राज ठाकरेंना सल्ला दिला आहे. तसेच, त्यांनी अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यावरूनही खोचक टोला लगावला आहे.
सत्तेत बसण्यासाठी नास्तिक लोक धार्मिक लोकांशी संगनमत करत असल्याचे सांगत कालीचरण महाराज म्हणाले,“सध्या आपली स्वत:ची विचारधारा सोडून कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेसाठी समर्पित होणे, कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांबरोबर सहभागी होणे हे चित्र दिसतंय. आता त्यांनी विचार करायला पाहिजे की जनता काय विचार करेल. जनतेसमोर असा प्रश्न उपस्थित झालाय की आता शरण कोणा जावे, सत्य कोणा मानावे”, असे कालीचरण महाराज म्हणाले आहेत.
त्यासोबतच “वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येतायत. नास्तिक लोक सत्तेत बसण्यासाठी धार्मिक लोकांशी संगनमत करत आहेत. कट्टर हिंदुत्ववादी लोकांनी राजकारणात घुसण्याची गरज आहे. विचारधारेला समर्पित लोकांनी सत्तेत येणं गरजेचं आहे. आपल्या विचारधारेला सोडून वाट्टेल त्याच्याबरोबर जाणे, वाट्टेल त्याला सोबत घेणे हे जनतेला समजतंय. फक्त सत्तेत बसण्यासाठी हे सगळं आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी कालीचरण महाराजांनी थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाच राजकीय सल्ला दिला आहे. “जो धर्माभिमानी असतो, तो नास्तिकांबरोबर तडजोड कशासाठी करेल? जनतेनं याचा विचार करायला हवा. राज ठाकरे आपल्या विचारसरणीवर ठाम आहेत. ते तडजोड करायला तयार नाहीत. पण त्यांनी जर हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आहे, तर हिंदुत्ववाद्यांबरोबर जायला काहीच हरकत नाही. पण हे माझं मत आहे. आता काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे”, असे त्यांनी नमूद केले.