-माधव विद्वांस
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आज स्मृतिदिन (निधन- 16 जानेवारी 1901). त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी 18 जानेवारी 1842 रोजी झाला. ते महाराष्ट्रातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थतज्ज्ञ होते. त्यांचे मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले तसेच माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईत झाले. लहानपणापासूनच शांत, सहिष्णू, निराहंकारी, उदार असल्यामुळे लोकांमध्ये प्रिय होते.
त्यांनी शिक्षण चालू असताना भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला होता. त्यांना वाचनाची आवड होती त्यामुळे त्यांनी शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांचेही अनेक ग्रंथ अभ्यासले. वर्ष 1862 मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी.ए.(ऑ.) झाले. त्यांची हुशारी पाहून प्राध्यापक-विद्वान मंडळी ही व्यक्ती मोठी होणार, असे म्हणू लागले. ते एल्फिन्स्टनमध्ये इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, इंग्लिश, निबंधलेखन इ. विषयांचे अध्यापन करू लागले.
वर्ष 1864 मधे एम.ए.ची परीक्षा दिली व वर्ष 1865 मध्ये कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये त्यांचा समावेश झाला. वर्ष 1866 च्या जूनमध्ये त्यांची सरकारच्या ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी नेमणूक झाली. मराठी भाषेत जे ग्रंथ त्या वेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र विषय यासंबंधी त्यांच्या अभिप्रायांत विस्तृत विवेचन केलेले आढळते. वर्ष 1868 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. त्यानंतर वर्ष 1871 मधे पुण्यास न्यायखात्यात दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. हे पद न्यायाधीशाचे समान होते. यावेळी पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली.
सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले. भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे “सार्वजनिक काका’ यांनी मोठी कामगिरी केली. स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले. भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा केली होती.
न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर 1893 साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. त्या काळात भारतीयांना उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद मिळणे अभिमानाची गोष्ट होती. त्यावेळी पुण्यातील जनतेने हा प्रसंग उत्सवासारखा साजरा केला. न्यायदानाच्या कामात त्यांनी नि:स्पृहपणा, कायदेशास्त्राचे सखोल ज्ञान व न्यायनिष्ठा हे त्यांचे गुण दाखवून दिले. उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झाला, असे सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्राप यांनी उद्गार काढले होते.