पिंपरी – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत हरभरा डाळ देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र. त्यानंतर अद्यापही शहरातील रेशनिंगधारकांना हरभरा डाळीचे वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे रेशनिंगधारकांकडून स्वस्त धान्य दुकानदारांकडे विचारणा होत असून, आम्हाला पुरवठा विभागाने डाळ उपलब्ध करुन दिल्यानंतर ती देऊ, अशी उत्तरे देताना दुकानदारांच्या नाकी नऊ येत आहेत.
राज्य सरकारातर्फे पात्र शिधापत्रिकांधारकांना प्रति शिधापत्रिका 1 किलो हरभरा डाळ वितरित करण्यात येणार होती. त्यानुसार अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना त्याचा लाभ मिळणार होता. अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून जुलै ते नोव्हेंबर या दरम्यान ते देण्यात येणार होते. जुलै महिन्यात त्या डाळीचे वाटप करणे आवश्यक होते. मात्र, ऑगस्ट महिना संपला, तरी डाळीची अद्याप प्रतीक्षा आहे. जूनपर्यंतचे वाटप झाल्यानंतर डाळ दुकानातून गायब झाली आहे.
हमीभावाने खरेदी केलेल्या धान्याचे वाटप
एखाद्या धान्याचे अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर राज्य व केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीमार्फत धान्य हमीभावाने खरेदी केले जाते. त्यानंतर स्थानिक पातळीवरील रेशनिंग दुकानदारांमार्फत वितरित केले जाते. या धोरणानुसार राज्यात भरड धान्याचे वाटप करण्यात आले. मात्र, पुणे जिल्ह्यातील मोफत हरभरा डाळ वितरणासाठी अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही.
राज्य शासनाकडून देण्यात येणारी डाळ अद्याप उपलब्ध झालेली नाही. ती आल्यानंतर तातडीने दुकानदारांना वितरित करण्यात येणार आहे. तशी माहिती दुकानदारांकडून मागवली आहे. वरिष्ठ पातळीवर मागणी सुरु आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
– नागनाथ भोसले, नायब तहसीलदार