पंतप्रधानपदाच्या अगदी जवळ पोहोचूनही अनेकदा या पदाने हुलकावणी दिलेले प्रणवदा हे एकमेव राजकारणी असावेत. याबाबत नशीबच जणू त्यांच्यावर रुसले होते. प्रणवदा इंदिरा गांधींच्या अगदी निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात. इंदिराजींचा सर्वांत विश्वासू म्हणून कॉंग्रेसमध्ये त्यांचा 15 वर्षे दबदबा होता. त्याकाळात पक्षाला ज्या ज्या वेळी संकटांनी घेरले त्या त्या वेळी पक्षाला आपल्या मुत्सद्दीपणाने प्रणवदांनी बाहेर काढले. हा सिलसिला मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळापर्यंत कायम होता.
सहा दशकांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत पंतप्रधान पदासाठी सर्वात लायक व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकीक होता. अनुभव, पात्रता आणि राजकीय कौशल्य त्यांनी बाणवले होते. इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत त्यांचा वारसदार म्हणून प्रणव मुखर्जी यांचाच उल्लेख व्हायचा. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या 31 ऑक्टोबर 1984 रोजी झाली. त्यावेळी ते राजीव गांधी यांच्यासोबत प. बंगालच्या दौऱ्यावर होते. हत्येचे वृत्त कळताच राजीव गांधी यांच्यासोबत ते दिल्लीला पोहोचले. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाने इंदिराजींच्या अचानक जाण्याने रिकामी झालेले पद राजीव यांना देण्याचा निर्णय एकमुखी घेतला. कॉंग्रेसने नेतृत्वाची माळ राजीव गांधी यांच्या गळ्यात घातली तरी कॉंग्रेस आणि गांधी घराण्यात प्रणवदाच महत्त्वाची भूमिका बजावत होते.
1984 मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले आणि प्रणव मुखर्जी त्यांचे सर्वात ताकदवान सहकारी बनले. त्यामुळे अर्थातच पक्षाच्या आणि सरकारचे नेतृत्व एकमुखी राजीव गांधी यांच्या ताब्यात आले. त्यावेळीही पक्षात आणि गांधी कुटुंबात प्रणवदांच्या शब्दाला जणू अंतिम मानले जात असे.
मात्र, 1984 च्या मध्यावधी निवडणुकांनंतर पंतप्रधानपदी राजीव गांधी यांची निवड झाली आणि आश्चर्यकारकरित्या मंत्रिमंडळातून प्रणवदांचे नाव वगळले गेले. मार्च 1985 मध्ये त्यांच्याकडे पक्षाच्या प. बंगालच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली गेली, पण सप्टेंबर महिन्यातच ती सूत्रे त्यांच्याकडून प्रियरंजनदास मुन्शी यांच्याकडे सोपवण्यात आली.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंहराव यांची पंतप्रधानपदी निवड झाली. त्यावेळी पक्षाध्यक्षपदी त्यांनी सीताराम केसरी यांची निवड केली. प्रणवदांना त्यावेळी पक्षाध्यक्ष व्हायचे होते. मात्र, ते गांधी कुटुंबीयांच्या जवळचे असल्याने नरसिंहराव यांनी आपले वजन केसरी यांच्या पारड्यात टाकले.
सोनिया गांधी यांनी पक्षात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सीताराम केसरी पक्षाध्यक्ष होते. मात्र, कार्यकारिणीची बैठक निमंत्रित करत नव्हते. त्याशिवाय सोनियांना पक्षाध्यक्षपदी नेमणे अशक्य होते. मात्र, मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन सोनियांना पक्षाध्यक्ष बनवले. त्यामुळे मुखर्जी यांची संधी पुन्हा एकदा हुकली. मात्र, सोनियांचा विश्वास कमावण्यात त्यांना वेळ लागला नाही. त्यानंतर प्रणवदांचे पक्षातील स्थान इंदिराजी यांच्या काळात होते तसे भक्कम झाले.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 2004 मध्ये सरकार स्थापन झाले त्यावेळी मुखर्जी यांना पंतप्रधान बनण्याची संधी आली. मात्र, यावेळी त्यांना ज्युनियर असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांना संधी मिळाली. या मंत्रिमंडळात त्यांना सन्मानाचे स्थान कायम राहिले. मुखर्जी यांनी पक्षाची सेवा करूनही त्यांना पंतप्रधानपद मिळाले नाही याची खंत सोनियांच्या मनात होती. म्हणून त्यांना राष्ट्रपतिपदाची संधी सोनियांनी दिली. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी निवड न झाल्याची खंत काहीशी कमी झाली. त्यांची राष्ट्रपतिपदाची कारकीर्द सर्वात कमी वादग्रस्त ठरली.
– मिथिलेश जोशी