पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पुणे, मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसला असून पिंपरी-चिंचवड येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी) आगारातून कोकण व सांगली, कोल्हापूर येथे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. बहुतांश धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, पाऊस सुरुच असल्याने सुरक्षेच्या कारणामुळे पूरस्थिती असणाऱ्या भागातील वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे.