हिमांशू
विश्वास ठेवा, युती झाली ती महाराष्ट्राच्या हितासाठीच. आघाडी झाली तीही महाराष्ट्राच्या हितासाठीच. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणाऱ्या-येणाऱ्या संस्थानिकांचा उलट-सुलट प्रवास झाला तो महाराष्ट्राच्या हितासाठीच. लाल मातीच्या आखाड्यात पहिलवान झुंजले तेही महाराष्ट्राच्या हितासाठीच.
अनेक ठिकाणी बंडाचं निशाण लागलं आणि एकाच घरातली माणसं आमने-सामने उभी ठाकली तीही महाराष्ट्राच्या हितासाठीच. ठेवणीतले शब्द वापरून भल्याभल्यांनी एकमेकांचा उद्धार केला, शब्दांत सांगता येत नाही ते हातवारे करून सांगितलं, संघर्ष झाले, फंदफितुरी झाली, हाणामाऱ्या झाल्या, प्रसंगी कार्यकर्त्यांनी आपलं आणि इतरांचं रक्त सांडलं… सारं-सारं या महाराष्ट्राच्या हितासाठी! सर्वेक्षण संस्थांनी “सखोल अभ्यास’ करून एक्झिट पोल तयार केले, वाहिन्यांनी ते दाखवले, अचानक शेकडो राजकीय विश्लेषक उगवले, आपापल्या परीनं घटनांचा उलटसुलट अर्थ लावू लागले, अंदाज बांधू लागले, चर्चा आणि वादविवाद करू लागले, अंदाज चुकल्यावर आपलीच पूर्वीची विधानं अर्थ बदलून सांगू लागले… हे सगळं महाराष्ट्राच्या हितासाठीच, दिवाळीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्रानं आपला कौल दिला, दिवाळीच्या आधीच फटाके वाजवले, गुलाल उधळला, नाचले, घोषणा दिल्या, त्याही महाराष्ट्राच्या हितासाठीच. तेल लावलेल्या-न लावलेल्या पहिलवानांना त्यांच्या जागा दाखवून मगच लोकांनी स्वतःच्या अंगाला दिवाळीचं तेल-उटणं लावलं, तेही महाराष्ट्राच्या हितासाठी.
आता प्रत्येक पक्ष जनताजनार्दनाच्या निर्णयाचा अर्थ आपापल्या सोयीनं लावतोय आणि सांगतोय, तोही महाराष्ट्राच्या हितासाठीच!
एका राज्याचं हित साधायचं म्हटलं तरी किती दिव्यं करावी लागतात ना? राजकीय पक्षांना आणि नेत्यांना आपापला पराक्रम अधोरेखित करणारी गाणी वाजवावी लागतात. टीव्हीवरून लागोपाठ जाहिराती दाखवाव्या लागतात. एका जाहिरातीत राज्य किती प्रगतीपथावर चाललंय हे दिसतं. काही क्षणातच दुसरी जाहिरात लागते आणि राज्य किती खड्ड्यात गेलंय हेही दिसतं. “कोण आला रे कोण आला, अमक्या-तमक्याचा बाप आला,’ अशा घोषणा देणाऱ्यांना कधी आपला नेता वाघ वाटतो तर कधी सिंह. एरवी कुपोषण, दुर्लक्ष आणि शिकारी-तस्करीमुळं जंगलात तडफडून मरणारे हे राजस प्राणी अचानक सिमेंटच्या जंगलात अवतरतात.
नागरिकांच्या डोक्यात प्रश्नांचं जंगल उगवतं आणि शहरातलं एकमेव जंगल मात्र रातोरात जमीनदोस्त होतं. हजारो झाडांचा जीव गेल्यावर यथावकाश प्रत्येक पक्षाला त्याविषयी भूमिका घ्यावीच लागते. झाडं सजीव असली तरी त्यांना मताधिकार नसतो; त्यामुळं ही भूमिकाही तात्पुरतीच असते आणि पुन्हा शहरात पाणी साचेपर्यंत पर्यावरण आदी विषय बॅकसीटला टाकणं जमावं लागतं. ज्या खड्ड्यात कालच एक बळी गेला, त्याच रस्त्यावरून विजयी मिरवणूक काढण्याचं धारिष्ट्य असावं लागतं. वेगवेगळ्या नेत्यांची निवडणुकीनंतरची वक्तव्यं, त्यांचे अर्थ, परिणामकारकता, स्वीकारार्हता… या घोळात जनतेला गुंतवावं लागतं.
…आणि खरं सांगू? आता काहीतरी उलथापालथ होणार, याची आम्हाला उत्कंठा असतानाच कोकणात एखादं खरोखरचं वादळ येऊन थडकतं. सुंदर समुद्रकिनारे उद्ध्वस्त करतं. मच्छीमारांना लाटेसोबत अनोळखी किनाऱ्यावर येऊन पडावं लागतं. हजारो हेक्टर भातशेती क्षणार्धात नेस्तनाबूत होते. त्या वादळ-लाटांना घाबरून आम्ही घरबसल्या राजकीय वादळ-लाटा पाहतो. कोकणातलं पर्यटन ठप्प होतं. तिकडे पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के बसू लागतात. आम्ही मात्र राजकीय भूकंपाची वाट पाहतो, तीही महाराष्ट्राच्या हितासाठीच!