बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बाबांनी पुण्यातील “आकुर्डी’ येथे घर बांधले. नवीन घरी काही कामानिमित्त नगरहून आलेले माझे मामा, मामी जाण्यास निघाले. परंतु, अगदी नवीन भाग असल्याने, आणि तेव्हा मोबाईलची वगैरे सोय नसल्याने, ते त्याच भागात थोडे इकडे तिकडे फिरत राहिले.असे गल्ल्यातून फिरता एका बंगल्याच्या दारात काळ्या फरशीवर छान, सुबकशी रांगोळी पाहिली मात्र माझ्या मामीने, तिच्या मोठ्या वन्सचे म्हणजे माझ्या आईचे घर रांगोळीवरून ओळखले. ही नक्कीच वन्सनी काढलेली रांगोळी आहे असे म्हणतच तिने बेल दाबली.
सांगायचा मुद्दा असा की दारापुढची रांगोळी ही त्या घरातील स्त्रीचा आरसा असते. हीच माझी मामी अचानक गेली, तेव्हा देखील तिच्या छोट्याशा देव्हाऱ्यापुढे तिने काढलेली सुबक रांगोळी पाहून माझेही मन भरून आले. तर अशी ही दारापुढे रांगोळी काढण्याची पद्धत आता फक्त समासुदीला बहुतेक घरांपुढे काढली जाते. पण पूर्वी जेव्हा वाडा पद्धती होती. तेव्हा सकाळच्या कामात अंगण झाडणे, सडा घालणे आणि रांगोळी काढणे या कामाला महत्त्व असे. कालानुरूप सर्वच गोष्टी बदलत गेल्या. तशी ही पद्धतही बंद झाली. जीवन गतिमान झाले. फ्लॅट संस्कृतीमध्ये उंबऱ्याच्या
बाहेरील सार्वजनिक जागेत रांगोळी काढणे अडचणीचे होऊ लागले. रांगोळी काढणे यामागे फक्त कला किंवा सुशोभित करणे हा हेतू नसून, त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. दारातील रांगोळीमुळे सरपटणारे प्राणी उंबऱ्याच्या आत येण्यास अडथळा निर्माण होतो व ती एक शुभसूचकही आहे. आता रांगोळ्यांचेही विविध प्रकार सुरू झाले आहेत. संस्कार भारतीच्या फार मोठ्या रांगोळ्यांनी हल्ली समारंभाची शोभा वाढते.
गणपती मिरवणुकीत तर रांगोळ्यांच्या पायघड्याही घातल्या जातात. खूप रंग आणि रांगोळीचा वापर यात केला जातो. हे करणारे काही विशिष्ट कलाकारही आहेत आणि खूप छान रेखाटने केली जातात. याशिवाय हे दोनही जमत नसेल तर त्यांच्यासाठी विविध छाप आयते तयार मिळतात. त्याने तर काम सुबक, पटकन आणि शोभिवंत होते.
परंतु ठिपके काढून ते एकमेकांना जोडून जी रांगोळी काढली जाते ना ती कला थोडी लोप पावत चालली आहे असे वाटते. ही कला फारशी शिकवून येत नाही. तिचे संस्कार लहानपणीच आई, आजी, मावशी किंवा आत्या यांचेकडून घरातच होतात. हे लहानपणी आम्हाला म्हणजे आज जे वयाच्या 50-55 च्या पुढे आहेत त्यांना मिळाले आणि त्यांनी ते जपलेसुद्धा.
पण मला मात्र ही ठिपक्यांची रांगोळी म्हणजे आपले आयुष्य वाटते. अनेक ठिपके जोडत जशी सुबक, रेखीव रांगोळी तयार होते त्यात रंग भरून आपण ती आणखीनच सुंदर करतो. तसेच आयुष्याचेही आहे. हे ठिपके म्हणजे एकेक व्यक्ती धरली तर त्यांचेशी नाते जोडतच आपापल्या आयुष्याची रांगोळी रेखाटत असतो.
रांगोळी काढताना जसा एखादा ठिपका फिसकटतो, तशी एखादी तरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असतेच. त्यांचेशी जोडू म्हणता जोडता येत नाही, सांधू म्हणता सांधता येत नाही. अहंकार, अपेक्षा, लोभ, राग यांनी काही नाती कायमची तुटतात पण तरीही हे फिसकटलेले ठिपके सांधायचा प्रयत्न करतच राहायचा आणि आपल्या आयुष्याची रांगोळी सुबक होईल, हे आपणच पहायचे. त्यात सुंदर रंग भरून आपले आयुष्य आपणच सुखी करायचे. चला तर मग ही ठिपक्यांची रांगोळीची कला आणि माणसे जोडणे शिकून घेऊयात. आयुष्य रंगीन होण्यासाठी…
– आरती मोने