बालचौर (पंजाब) – पंजाबात प्रचार करताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी पुन्हा 1984 च्या शीख विरोधी दंगलीचा विषय उपस्थित करून कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. त्यावेळी कॉंग्रेसने शिखांची कत्तल करून मानवतेला लाज आणण्याचे कृत्य केले आहे असा आरोप त्यांनी केला.
शिख विरोधी दंगलींच्या संबंधात प्रतिक्रिया देताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी मोठे झाड पडल्यावर पृथ्वी हादरते असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत नड्डा म्हणाले,हे तेच लोक आहेत ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत. कॉंग्रेस नेत्यांनी माणुसकीला काळीमा फासला आहे.
शिख विरोधी दंगलीच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना नढ्ढा म्हणाले, तीस वर्षे आरोपी दिल्ली आणि पंजाबमध्ये मोकळेपणाने फिरत होते, कोणीही दखल घेतली नाही. पण मोदींच्या काळात त्यांची चौकशी सुरू झाली.पंतप्रधान मोदींनी एसआयटी स्थापन केली आणि आज जे दिल्ली दंगलीत सामील होते ते आता तुरुंगात आहेत असे ते म्हणाले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केल्यानंतर शिखांच्या विरोधात प्रचंड दंगली उसळल्या होत्या.
अधिकृत नोंदीनुसार, या दंगली दरम्यान भारतभरात सुमारे 2,800 शीख मारले गेले, ज्यात दिल्लीतील 2,100 शिखांचा समावेश आहे. त्याच मुद्द्याचे नड्डा यांनी आपल्या प्रचार सभेत भांडवल करून कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.