– सूरज व्यास
पिंपरी-चिंचवड शहर आमचे आहे या सम!
तडफेने तुडवू काळी आणि लाल माती,
गावकी-भावकीसह बाहेरवाल्यांशीही जुळवू नाती!
ऐकू झाडांवरील चिवचिव धडधडत्या यंत्रांसह,
पिंपरी-चिंचवड शहर आमचे आहे या सम!
गावठाणांसह वेगे वाढवू “स्मार्ट सिटी’,
“एक्झिबिशन’ सह गावजत्रेत वाजवू शिटी,
“कॉंटीनेंटेल’सह चाखू गावरान कोंबडी भाकरीसह,
पिंपरी-चिंचवड शहर आमचे आहे या सम!
प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराच्या मनातील या ओळी या शहराचे आगळेवेगळे वैशिष्ट्य अभिमानाने मिरवायला नक्कीच प्रोत्साहित करतील. ग्रामीण आणि शहरी जीवनाचा इतका सुरेख संगम इतरत्र क्वचितच पाहण्यास मिळेल. लहान-लहान गावे, दगडी खाणी, चिंच, पिंपळ, वड अशा विशालकाय वृक्षांनी समृद्ध असलेला परिसर आज पिंपरी-चिंचवड शहर बनून देशाच्या विकासात मोठे योगदान देत आहे. ऑटो हब, आयटीनगरी, एज्युकेशन हब, उद्योगनगरी असे अनेक मानाचे तुरे या शहराच्या शिरपेचात शोभिवंत आहेत. प्रशस्त रस्ते, उड्डाण पूल, उद्याने, उंच इमारती, कमर्शियल कॉम्पलेक्स, लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह करणारे दहा हजारांहून अधिक उद्योग-व्यवसाय अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराने आपली खास ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपत आधुनिकतेचा साजही चढवला आहे.
स्मार्ट सिटीच्या वाटेवर असलेल्या या शहराच्या वैभवात आता मेट्रोचीही भर पडत आहे. शहराच्या या जडण-घडणात अनेकांनी आपले योगदान दिले आहे. सत्ताधारी असो वा विरोधक सर्वांनीच या शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. हजारो उद्योगांमधील लाखो यंत्रे धडधडत असतानाही पर्यावरण जपणारे, स्मार्ट सिटी असतानाही शेती करणारे, आयटी क्षेत्राद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यातील कामे या शहरात बसून करणारे, कला आणि संस्कृती देखील तेवढ्याच आवडीने जोपसणारे पिंपरी-चिंचवडकर सातत्याने आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यास अग्रेसर असल्याचे दिसून येते.
देशाला कोट्यवधींचा महसूल देणारे शहर
दोन गावे एकत्र करून पिंपरी-चिंचवड शहराची स्थापना झाली. तिथून सुरू झालेल्या या शहराचा विकासाचा वेग कुणालाही थक्क करेल. 1954 साली पिंपरीमध्ये हिंदुस्थान ऍन्टिबायोटिक्स (एचए) कारखाना सुरू झाला. एच. ए. नंतर या परिसरात अनेक कारखाने उभारले जाऊ लागले. त्यामुळे कामगारांची संख्या वाढू लागली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी येथील ग्रामपंचायती विसर्जित करून 4 मार्च 1970 रोजी नगरपालिका स्थापन झाली. त्यानंतर सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, थेरगाव, वाकड या गावांचा समावेश करून 11 ऑक्टोबर 1982 रोजी महापालिका अस्तित्वात आली. 1997 मध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोवीसावाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे या गावांचा समावेश करण्यात आला. हिंजवडी, तळवडे आदी भागातील आयटी पार्कमुळे पिंपरी-चिंचवडची ओळख जगभरात निर्माण झाली.
उद्योगांनी येथे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण केल्या. केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून उदरनिर्वाह आणि शिक्षणासाठी लाखो नागरिक येथे दाखल झाले. वाहननिर्मिती आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्यांनी शहरात बस्तान बसविले आणि त्यांच्यासोबत हजारो लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी शहर नंदनवन बनले. या उद्योगांनी शहराच्या अर्थव्यवस्थेला गती तर दिलीच; परंतु राज्य आणि केंद्र सरकारलाही दरवर्षी कोट्यवधींचा महसूल देत देशाच्या विकासातही सिहांचा वाटा उचलला आहे.
मूलभूत आणि पायाभूत सुविधा पुरविणारे नियोजनबद्ध प्रशासन
काही दशकातच शहराची लोकसंख्या कैक पटीने वाढली. लोकसंख्या वाढत असतानाच त्यांना मूलभूत आणि पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर आली. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सत्ताधारी, विरोधक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सामूहिक प्रयत्नांनी ही जबाबदारी लिलया पार पाडली आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून देत असताना शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्याकडे देखील लक्ष दिले आहे. विकास करताना शहर बकाल होणार नाही, यासाठी देखील अनेकांनी प्रयत्न केले. रस्ते, वीज, पाणी, मलनिस्सारण यांसारख्या पायाभूत सुविधा पुरविण्यात महापालिका यशस्वी ठरली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनांद्वारे अनेकांना हक्काची घरे मिळाली. इतर बड्या शहरांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या पिंपरी-चिंचवडमध्ये उद्भवू नये, याची काळजी प्रशासनाने घेतली. या शहराला कधीही तीव्र पाणी टंचाईचे संकट सोसावे लागले नाही.
वेळप्रसंगी काहीसे कटू वाटणारे निर्णय घेत भविष्याची काळजीदेखील सत्ताधारी व प्रशासनाने घेतली. समपातळीने पाणी वितरण, ऑनलाइन बिल भरणा, पाणीपुरवठा तक्रारींसाठी कॉल सेंटर, जलशुद्धीकरण केंद्रांची अत्याधुनिक पद्धतीने उभारणी करण्यात आली आहे. याबद्दल भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने प्रथम क्रमांकाच्या “इम्प्रुव्हमेंट इन वॉटर सप्लाय अँड वेस्ट वॉटर सेक्टर’ हा पुरस्कार देखील आपल्या शहराच्या महापालिकेला मिळालेला आहे. लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या उद्योगांनी शहराच्या विकासातही आपला मोलाचा वाटा उचचला. अनेक गरजा भागविण्यासाठी उद्योग क्षेत्र सीएसआरच्या माध्यमातून पुढे सरसावले आहे.
विविध क्षेत्रांत प्रगतीची झेप
खवय्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या मोठ-मोठ्या हॉटेल्सपासून रस्त्यावरील हातगाड्यांपर्यंत सर्वकाही या शहरात आहे. नाटके व इतर कलांद्वारे रसिकांना तृप्त करण्यासाठी भव्य-दिव्य नाट्यगृहे, मनोरंजनासाठी सिनेमागृह, उद्याने, प्रेक्षणीय स्थळे तर या शहरात आहेतच. परंतु त्यासोबतच ऑटो क्लस्टर, इंजिनिअरिंग क्लस्टर सारख्या उद्योगनगरीची प्रतिष्ठा वाढविणारी अनेक स्थळे शहरात आहेत. यामुळे जगभरातील उद्योग छोट्या-मोठ्या औद्योगिक प्रदर्शनांच्या माध्यमातून शहरात येत आहेत. या शहरात आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या प्रदर्शनापासून ते फूल, भाज्या आणि कृषीविषयक प्रदर्शने देखील आयोजित केली जातात. याचा अर्थ हे शहर सर्वकाही आपल्यात सामावून घेणारे शहर आहे. महापालिकेला प्राप्त झालेल्या बेस्ट सिटी पुरस्कारामुळे शहराच्या विकासकामांच्या पाहणीसाठी परदेशी पाहुण्यांचा राबता वाढला आहे. सायन्स पार्क हा शहराच्या लौकिकात भर घालणारा आणखी एक उपक्रम मल्टीप्लेक्स, मॉल्स्, नाट्यगृह, हॉटेल्सची संख्या वाढत आहे. नामांकित शिक्षण संस्था, रुग्णालये शहरात दाखल झाली आहेत.
शहराचे लौकिक वाढविणारे महत्त्वाकांक्षी प्रकल्प
महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या उच्च दर्जाच्या नागरी सोयीसुविधांमुळे महापालिकेला आयएसओ 9001:2008 हे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांत महापालिकेच्या कामकाजाची गती वाढली. काळासोबत शहर धावत असल्याने अत्याधुनिक प्रकल्प याठिकाणी उभे राहत आहेत. नाशिक फाटा आणि एम्पायर इस्टेट येथे दुमजली उड्डाण पूल, थेरगावातील उड्डाण पूल, मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक प्रदर्शन केंद्र, सिटी सेंटर, बीआरटीएस यांसारख्या प्रकल्पांमुळे शहराचे महत्त्व वाढणार आहे. आता मेट्रो प्रकल्पाचे कामही सध्या अंतिम टप्प्यात आहे.
ई-गर्व्हनन्सचा अवलंब
यापूर्वी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानामध्ये सहभागी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने ई-गव्हर्नन्सचा अवलंब केला. ई-गर्व्हनन्स अंतर्गत महापालिकेने विविध ई-सुविधा उपलब्ध करून दिल्या. बांधकाम परवाना, झोन दाखले, जन्म-मृत्यू दाखले, नागरी सुविधा विषयक तक्रारी तसेच ई-निविदा, आपत्ती व्यवस्थापन प्रणाली, क्रीडांगणाचे बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
हेल्थकार्ड योजनेद्वारे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे (वायसीएम) कामकाज पेपरलेस करण्याचे प्रयत्न होत आहेत. भौगोलिक सूचना प्रणाली (जीआयएस) प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या एकूण 181 चौरस किलोमीटर क्षेत्राचे क्वीक बर्ड सॅटेलाईट इमेज घेण्यात आली आहे. सिटी सर्व्हेचे नकाशे डिजिटाईझशेन करून वापरण्यात आले आहेत. ऑनलाइन प्रणालीद्वारे कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, कामकाजाचे व्यवस्थापन व नियंत्रण आदी कामे चालतात. लेखा विभागाचे संगणकीकरण करण्यात आले असून नागरिकांकडून पैसे स्वीकारणे व त्याबाबतची पावती देणे इ. कामकाजापासून, कॅशबुकपर्यंतची सर्व कामे संगणकीकृत करण्यात आलेली आहेत. ई-गव्हर्नन्सच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता महापालिकेने एम (मोबाइल) गव्हर्नन्सवर लक्ष केंद्रित केले आहे.
उद्योगनगरी आणि उद्याननगरीही
पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक उद्योग, प्रशस्त रस्ते आणि लाखो वाहने असल्याने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच पर्यावरण जपण्यासाठी मोठे प्रयत्न होताना दिसतात. महापालिकेने 350 एकर जागेवर तब्बल छोटी-मोठी 157 उद्याने विकसित केली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी असेही संबोधले जात आहे. भक्ती-शक्ती उद्यान, भोसरी सहल केंद्र, पिंपळे गुरव येथील डायनासोर उद्यान, सांगवीतील शिवसृष्टी उद्यान, कासारवाडीतील संगीत कारंजे असलेले उद्यान यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण उद्याने महापालिकेने उभारली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच विदेशातील उद्यानांचा अभ्यास देखील त्यासाठी केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. महापालिकेने नदी सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे नदी स्वच्छतेबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे.