मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या, यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र या शुभेच्छा देताना त्यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत शुभेच्छांचे बॅनर लावले आहेत. यावरून आज जितेंद्र आव्हाड यांनी, “भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत, ते पाहिलं मी. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून इच्छा आहे. सध्या एकच आमदार आहेत. आता ५०-६० तरी वाढवावे लागतील. त्यासाठी कृतीशील कार्य करावं लागेल, याच शुभेच्छा”, असे आव्हाड म्हणाले. तसेच “फक्त टोमणे, नकला न करता महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप काय हे महाराष्ट्राला कळलं तर जास्त बरं होईल”,असाही टोला आव्हाडांनी यावेळी लगावला.
सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर न्यायालयाने उद्धव ठाकरेंचे सरकार पुनर्स्थापित करता येत नाही असे म्हटले. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आपल्या अखत्यारित येत नसून तो विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हे मुख्य प्रतोद आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं आहे. जितेंत्र आव्हाड म्हणाले, “विधानसभेत व्हीप कोणाचा असेल, लीडर ऑफ हाऊस कोणाचा असेल याबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय हे जाणून घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस या विषयावर एकही शब्द बोलत नाहीत. देवेंद्रजींचं एकच म्हणणं असतं. जितेंद्र ना… जितेंद्रला काही कळतच नाही. परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा त्या हुशार माणसाने व्यवस्थित समजून घेतला आहे. त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसतोय.”