बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या राज्यभर सुरू आहे. नुकतीच ती बीड जिल्ह्यात गेली असता तिथे नाट्यमय प्रसंग पहायला मिळाला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. आमच्या काकांनी 50 कोटी रुपये देवून मंत्रीपद मिळवले असल्याचा गंभीर आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. संदीप क्षीरसागर यांनी हा आरोप भरसभेत केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमप्रसंगी मंचावर राष्ट्रववादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे हे देखील उपस्थित होते. तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हेदेखील यावेळी उपस्थित होते. संदीप क्षीरसागर यांनी यावेळी काका जयदत्त यांच्यावर मंत्रीपदासाठी 50 कोटी दिल्याचा आरोप केला तसेच एवढे पैसे जिल्ह्याच्या विकासासाठी लावले असते तर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला असता असेही ते म्हणाले. तसेच संदीप यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्याविषयी बोलताना, अण्णा तुम्ही काही दिवसांपासून आम्हाला हातातील घड्याळ काढा आणि हाती धनुष्य घ्या असे सांगत होता, पण अण्णा तुमचे वय आता धनुष्य उचलण्याचे राहिले नाही त्यामुळे तो उचलण्याचा प्रयत्न केलात तर बरगड्या मोडतील असे म्हणाले.