jayant patil on gujrat election : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या चपखल वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आज शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात देखील जयंत पाटील यांचा हाच अंदाज पाहायला मिळाला. उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच एका वक्तव्याचे उदाहरण देत गुजरात विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबत भाष्य केलं. गुजरातमध्ये भाजप सत्ताधारी पक्ष असून यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेस व आम आदमी पक्षाचे आव्हान असणार आहे. अशातच जयंत पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांवेळी केलेल्या एका वक्तव्याचा धागा पकडत निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांवेळी राज्यात पूल पडल्याची एक दुर्घटना घडली होती. यावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी यांनी, राज्यात घडलेली पूल पडण्याची घटना हे येत्या निवडणुकांमध्ये राज्य सरकार कोसळणार असल्याचे ईश्वरीय संकेत असल्याचे म्हंटले होते. मात्र पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मोदींनी केलेल्या भाकिताप्रमाणे काहीही झालेलं दिसलं नाही. उलट ममता बॅनर्जी यांनी बहुमतासह पुन्हा सत्तेत येत भाजपची स्वारी परतवून लावली होती.
जयंत पाटलांचा निशाणा | jayant patil on gujrat election
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच वक्तव्याचा धागा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, गुजरातेत झालेल्या मोरबी दुर्घटनेशी जोडला आहे. मोरबी येथे पूल पडून झालेल्या दुर्घटनेत १३२ पेक्षा अधिक जणांना आपले प्राण गम्मवावे लागले आहेत. मोरबी दुर्घटनेचा दाखल देत जयंत पाटील यांनी, “पश्चिम बंगालमध्ये मागे एकदा पूल पडला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘पूल पडणे हा राज्यातील सरकार बदलाचा ईश्वरीय संकेत आहे’. जर हा सरकार बदलाचा ईश्वरीय संकेत असेल, तर गुजरातमध्ये नुकताच मोरबी येथील पूल कोळला आहे. मग हा ईश्वरीय संकेत गुजरातमध्ये मिळाला आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.” अशी टीका केली.
भाजपवर माघार घेण्याची नामुष्की
यावेळी जयंत पाटील यांनी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत भाजपवर माघार घेण्याची नामुष्की ओढावल्याचा दावा केला. ते म्हणाले, “नुकताच अंधेरीची पोटनिवडणूक झाली. या निडणुकीत भाजपवर माघार घेण्याची नामुष्की ओढवली. त्याला त्यांनी ‘महाराष्ट्राची संस्कृती’चे नाव दिले. मग ही संस्कृती कोल्हापूर आणि पंढरपूरच्या निवडणुकीत कुठं गेली होती? असा प्रश्न त्यांनी भाजपाला विचारला. सोयीचं असेल तसं राजकारण करायचं आणि आपण बोललेलं वाजतं हा आत्मविश्वास असणाऱ्या लोकांबरोबर आमची लढाई आहे.”