मुख्य समस्येवरून लक्ष विचलीत करण्याचा आहे डाव
नवी दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीला बदनाम करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. ज्या लोकांनी या चित्रपटसृष्टीचा लाभ उठवला त्यांनीच या बदनामीच्या प्रकारात मोठा वाटा उचलला आहे. ज्या थाळीतून खाल्ले त्या थाळीतच घाण करण्याचा हा प्रकार आहे अशा शब्दात समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी आज राज्यसभेत आपला आवाज उठवला आहे.
जया बच्चन यांनी यावेळी कोणाचे नाव घेतले नाही. भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भोजपुरी अभिनेते रवि किशन यांनी कालच चित्रपटसृष्टीवर ड्रग्ज माफीयांचे राज्य असल्याचे विधान केले होते तसेच कंगना राणावत हिने या चित्रपटसृष्टीचा उल्लेख गटार असा केला होता. त्या पार्श्वभूमीवर जया बच्चन यांनी आज राज्यसभेत ही आगपाखड केली.
सोशल मीडियावर आणि अन्यत्रही चित्रपटसृष्टीची बदनामी केली जात असून सरकारने तिला समर्थन देऊन मदत केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. चित्रपटसृष्टीचा गटार असा उल्लेख आपल्याला मान्य नाही असेही त्या म्हणाल्या. ज्यांनी याच चित्रपटसृष्टीत येऊन नाव कमावले त्यांनी या उद्योगाला बदनाम करणे हा कृतघ्नपणा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चित्रपट सृष्टीतून रोज पाच लाख लोकांना रोजगार मिळतो आणि किमान पन्नास लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो असेही त्यांनी सांगितले. रोजगार आणि खराब अर्थव्यवस्थेकडून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हा सारा प्रकार सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
या वातावरणात सरकारकडूनही कोणतीही मदत मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. सरकार या तोंडाळ लोकांना गप्प राहण्याची सूचना करेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.