राष्ट्रपतींचे फेररचना कायद्यावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीर फेररचना कायद्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 31 ऑक्टोबरपासून त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असेल.
दहशतवादाने ग्रासलेल्या जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी मोदी सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यानुसार, जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यासाठी 370 कलम हटवण्यात आले. त्या राज्याचे विभाजन दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्याचे पाऊल उचलण्यात आले. त्यासंबंधीच्या कायद्याला संसदेने नुकतीच मंजुरी दिली.
आता राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो कायदा लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेक संस्थाने भारतात विलीन केली. त्यांच्या जयंती दिनीच (31 ऑक्टोबर) जम्मू-काश्मीर आणि लडाख हे नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार असल्याच्या घडामोडीला महत्व आहे.
स्वतंत्र अस्तित्वानंतर जम्मू-काश्मीरसाठी विधानसभा असेल. तर लडाखसाठी विधानसभेची तरतूद करण्यात आलेली नाही.