अनिर्णित सामन्यात नदीमचे पाच बळी
तरौबा, त्रिनिनाद – वेस्ट इंडिज “अ’ संघाच्या फलंदाजांनी झुंजार खेळ करीत भारत “अ’ संघाविरूद्धचा तिसरा अनधिकृत क्रिकेट कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळविले. मात्र भारताच्या शहबाज नदीमने पाच विकेट्स घेत शेवटच्या दिवशी वर्चस्व गाजविले. तीन सामन्यांची ही मालिका भारताने 2-0 अशी जिंकली.
विंडीजपुढे 373 धावांचे आव्हान होते. सलामीवीर जेरेमी सोलोझानो, ब्रॅन्डन किंग व सुनील ऍम्ब्रीस यांनी केलेल्या शैलीदार अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांचा डाव 6 बाद 314 धावांवर रोखण्यात भारताला यश मिळाले. भारताने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय मिळविला होता.
सोलोझानोने मॉंटसिन हॉजच्या साथीत 68 धावांची भागीदारी करीत चांगला पाया रचला. हॉजने 25 धावा केल्या. त्याच्या जागी आलेल्या किंगने झंझावती खेळ करीत मैदान दणाणून सोडले. त्याने 10 चौकार व 3 षटकारांसह 77 धावा केल्या. सोलोझानोच्या साथीत त्याने 17.5 षटकांत 99 धावा जमविल्या. त्याच्या जागी आलेल्या ऍम्ब्रीसनेही भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ऍम्ब्रीस व सोलोझानो यांनी दमदार खेळ करीत तिसऱ्या विकेटसाठी 21.1 षटकांत 60 धावा जमविल्या. या भागीदारीमुळे हा सामना जिंकण्याच्या भारताच्या आशा धुळीस मिळाल्या .
सोलोझानोला शतक पूर्ण करण्यात अपयश आले. हनुमा विहारीच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवालने त्याचा झेल घेतला. सोलोझानोने 287 मिनिटांच्या संयमपूर्ण खेळात 5 चौकारांसह 92 धावा केल्या. ऍम्ब्रीसने 5 चौकार व एक षटकारासह 69 धावा केल्या. भारताकडून नदीमने 103 धावांमध्ये 5 गडी बाद केले. या मालिकेतील चार डावांमध्ये त्याने पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
संक्षिप्त धावफलक – भारत ‘अ’ 201 व 4 बाद 365 घोषित वेस्ट इंडिज ‘अ’ 194 व 6 बाद 314 (जेरेमी सोलोझानो 92, ब्रॅन्डन किंग 77, सुनील ऍम्ब्रीस 69, शहबाज नदीम 5-103)