नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आता आपला मोर्चा पुन्हा कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्याकडे वळवला आहे. वड्रा यांच्या विरोधात खटला चालवण्याची आवश्यकता असून त्यांच्यासाठी तुरूंगच योग्य जागा असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे.
स्वामी म्हणाले की, 2011 मध्ये ते हार्वर्डला गेले होते तेव्हा वाड्रा यांच्या गुंडांनी त्यांच्या निजामुद्दीन येथील निवासस्थानावर हल्ला करत तोडफोड केली होती. वाड्रा अत्यंत घाबरट माणूस आहे. गेल्याच आठवड्यात राजस्थान उच्च न्यायालयाने वाड्रा आणि त्यांच्या आईच्या विरोधात मनी लॉंड्रिग प्रकरणात दाखल झालेला खटला रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. त्या पार्श्वभूमीवर स्वामींनी ही टीका केली आहे.