नवी दिल्ली – राहुल गांधी यांची भगवान रामाशी तुलना केल्याबद्दल भाजपने मंगळवारी कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी सांगितले की, कॉंग्रेस मते मिळविण्यासाठी कोणाचेही नाव घेऊन राजकारण करत आहे.
हे कॉंग्रेस पक्षाच्या डीएनएमध्ये आहे. जर त्यांना मते हवी असतील तर ते कोणत्याही प्रकारचे राजकारण करू शकतात आणि सलमान खुर्शीद यांनी आमचे आराध्य दैवत भगवान श्री राम यांची तुलना एका जामीनावर असलेल्या व्यक्तीशी (राहुल गांधी) करणे निंदनीय आहे, त्यामुळे भारतातील लोक त्याला उत्तर देतील, असे गौरव यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ही तीच कॉंग्रेस आहे जी प्रभू राम काल्पनिक असल्याचे म्हणायचे. त्यांच्या अशा विधानांवरून भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा विजय स्पष्टपणे दिसत आहे. हे अगदी स्पष्ट आहे की, कॉंग्रेस नेते केवळ मतांसाठी राजकारण करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. हे कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या डीएनएमध्ये आहे. राहुल गांधी यांना ढोंगी हिंदू म्हणणे चुकीचे नाही.ते केवळ निवडणूकीपुरते हिंदू बनतात.
कॉंग्रेसकडून महापुुरुषांचा सतत अवमान
कॉंग्रेसकडून आजवर कुुठल्याही महापुरुषाचा सन्मान करण्यात आलेला नाही. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल असोत किंवा डॉ बी.आर. आंबेडकर किंवा नेताजी सुभाषचंद्र भोस असोत, कॉंग्रेसने कोणालाही त्यांचा योग्य सन्मान दिलेला नाही, त्यांचा सतत अवमानच केलेला आहे. डॉ. आंबेडकर व सरदार पटेल यांना 1990 आणि 1991 मध्ये भारतरत्न मिळाले.
मात्र जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना त्यांच्याच मंत्रिमंडळाने भारतरत्न दिले होते. अगदी राजीव गांधींनाही 1991 मध्ये भारतरत्न मिळाले होते. त्यामुळे दांभिकतेचे राजकारण करणाऱ्या राहुल गांधींनी, अटबिहारी वाजपेयींचा आदर्श घ्यावयाला हवा. असेही पुढे बोलताना भाटिया यांनी म्हटले आहे.