नवी दिल्ली : संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाले असून काही राज्यांमध्ये मुसळधार पासून पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून त्याठिकाणची जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे काही राज्यमणध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. दरम्यान, हवामान विभागाने, येणाऱ्या चार दिवसात देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा आणि महाराष्ट्रात 5 आणि 6 जुलैला, गुजरातमध्ये 7 जुलैला पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यामध्ये आसाम, मेघालय, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच सिक्कीम, तामिळनाडू, पुडुचेरीत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा राज्यात 6 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली येथे 6 ते 8 जुलै, दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये 5 आणि 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच 7 ते 8 जुलै रोजी झारखंड आणि पश्चिम राजस्थान तसेच गुजरातच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, छत्तीसगड, उप-हिमाचल पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.