मांजरी – पुणे महापालिकेत फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आली होती. परंतु, महापालिकेकडून सोयी सुविधा न देताच भरमसाठ मिळकत कर आकारला जात होता. याला विरोध करीत या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच केल्यानंतर याबाबतची अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून स्वतंत्र हडपसर महापालिकेच्या मागणीचा मुद्दा मागे पडून आता, लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायतींची मिळून नगरपरिषद करावी अशी, मागणी आत होऊ लागली आहे.
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील बहुतांशी गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्यानंतर हडपसर ही स्वतंत्र महापालिका व्हावी, यामध्ये फुरसुंगी, उरूळीदेवाची, मांजरी, शेवाळेवाडी, लोणीकाळभोर, वाघोली अशा गावांचा समावेश करावा, अशी मागणी होऊ लागली होती. परंतु, फुरसुंगी आणि उरूळीदेवाची या गावांनी स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी केल्यानंतर हडपसर नवी महापालिका करण्याबाबतचा मुद्दा मागे पडू लागला. त्यातच या दोन गावांच्या नगरपरिषदेबाबतच्या अंतिम निर्णयाची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
फुरसुंगी गावाची लोकसंख्या 66 हजार, तर उरुळी देवाची या गावाची लोकसंख्या 10 हजार इतकी आहे. या दोन गावांसाठी “ब’ वर्गाची नगरपरिषद स्थापन होऊ शकते, या नियमानुसार या गावांसाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय होत असताना आता लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायतींची मिळून नगरपरिषद करावी असा मुद्दा पुढे येऊ लागला आहे. या तिनही गावांची लोकसंख्या मिळून एक लाखापेक्षा अधिक होऊ शकते, त्यामुळे नवी नगरपारिषद सहज निर्माण होऊ शकते.
ग्रामपंचायत प्रशासनाकडे विकासकामांसाठी निधीचा तुटवडा असतो. नगरपरिषद झाल्यास अधिक निधी उपलब्ध होऊ शकेल. यामुळे रस्ते, क्रीडांगण, पाणी पुरवठा, मलनिस्सारण आदी गोष्टींवर खर्च करून एक सुनियोजित उपनगर वसविता येऊ शकते, यामुळे तीन गावांचीही नगरपरिषद करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.