कराड -कॉंग्रेस विचारधारेबरोबर होतो, आहे आणि भविष्यातही राहणार आहे, असे म्हणत आ. पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटांनी एकत्र येण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ना. सतीश उर्फ बंटी पाटील, ना. विश्वजित कदम, आ. पृथ्वीराज चव्हाण, विलासराव पाटील-उंडाळकर व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कराड येथील पंकज हॉलमध्ये शुक्रवार, दि. 6 रोजी दुपारी 2.30 वाजता जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड-दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहराध्यक्ष राजेंद्र माने व रयत संघटनेचे अध्यक्ष प्रा. धनाजी काटकर यांनी दिली.
कराड येथील काका-बाबा गटाचे ऐतिहासिक मनोमीलन व कॉंग्रेस मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, नगरसेवक इंद्रजित गुजर, इंद्रजित चव्हाण, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मोहन शिणगारे, बांधकाम समितीचे सभापती राजेंद्र यादव उपस्थित होते. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, कॉंग्रेसची विचारधारा देशाला दिशा देणारी आहे. या विचारधारेशी आ. पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर
यांच्यासह त्यांच्या कुटुुंबीयांची बांधिलकी आहे. काका-बाबा गटांमध्ये समेट होऊन जिल्ह्यासह बळकटी मिळावी, ही तमाम कॉंग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार जिल्ह्यात कॉंग्रेसच्या बळकटीकरणासाठी हा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला आहे.
या निर्णयामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यात अनेक बदल झालेले दिसून येतील. प्रा. काटकर म्हणाले, काका-बाबा गटांच्या मनोमीलनात ना. सतेज उर्फ बंटी पाटील व मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची मोठी भूमिका आहे. सातारा येथे काकांच्या निवासस्थानी काका-बाबा यांची पहिल्यांदा भेट झाली होती. तेव्हा पक्षाची ताकद वाढविण्यासाठी काका-बाबा मनोमीलनावर चर्चा झाली होती. कॉंग्रेसच्या भल्यासाठी असे करण्यात मला कोणतीही अडचण नसल्याचे विलासकाकांनी स्पष्ट केले होते.
कोणत्याही पदाशिवाय फक्त पक्षासाठी काम करण्याचा निर्णय काका आणि त्यांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील यांनी घेतला आहे. मनोहर शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षात काका-बाबा गटांनी एकत्र येत विशिष्ट ताकद रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या होत्या. ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, मलकापूर व कराड नगरपालिकांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी या दोन्ही नेत्यांनी दिली आहे. कॉंग्रेसच्या मजबुतीकरणासाठी ही मंडळी मनाने एकत्रित आली आहेत. काका-बाबा मनोमीलनामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे.
पुस्तकातील सर्व पाने परत येतील
कराड पालिकेतील 16 पैकी 15 नगरसेवक परत आले तर त्यांना स्वीकारणार का, या प्रश्नावर बोलताना डॉ. जाधव म्हणाले, आमचे प्रयत्न पक्षवाढीचे आहेत. ते फक्त कराडपुरते मर्यादित नाहीत. काका-बाबा मनोमीलनानंतर संपूर्ण जिल्ह्यात बदल दिसून येईल. दरम्यान, पुस्तकाचे “कव्हर’ सोडून सर्व “पाने’ भविष्यात परत येतील, असे सूचक विधान इंद्रजित चव्हाण यांनी केले. कॉंग्रेस सोडून गेलेल्या आणि काका-बाबा मनोमीलनात मिठाचा खडा टाकणाऱ्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देणार का, या प्रश्नावर डॉ. जाधव म्हणाले, पक्षवाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी योग्य वेळ आणि काळ यायला हवा.